सातारा – ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये अनेकांचे योगदान आहे. प्रगतीचा चढता आलेख सर्वांच्या सहकार्याने यापुढेही असाच सुरु राहील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरूवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला.
त्यावेळी ते बोलत होते.ध्वजवंदनानंतर पोलीस पथकाने त्यांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक व हुतात्मा जवानांचे कुटुंबीय आणि नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कृषी व सहकारामध्ये राज्यात जिल्ह्याचा नावलौकीक आहे, असे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, “”सातारा जिल्हा स्वातंत्र्यसैनिकांचा जिल्हा आहे. कोयना धरणातून वीजनिर्मिती केली आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कास पुष्प पठार जागतिक पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटनस्थळांच्या विकासाबरोबर इतर पर्यटनस्थळांचाही विकास करण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
जिल्हा वार्षिक योजना सुमारे 600 कोटीचा वाढीव आराखडा शासनास सादर केला आहे. देशाच्या साखर उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. यामध्ये सातारा जिल्हाही अग्रेसर आहे.” कोयना, धोम, कण्हेर, वीर अशा विविध धरणग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यात पर्यायी जमिनीवाटपासंदर्भात शासनाची भूमिका सकारात्मक आहे. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन प्रश्न सोडविण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. सरकार सर्वसामान्याचे असून विकासाबाबत कुणाच्या सकारात्मक सूचना असतील तर त्या सांगाव्यात, त्यांची अंमलबजावणी केली जाईल. तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढील काळात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे.” देशासह राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या प्रगतीमध्ये आपला जिल्हाही कुठे मागे पडू नये यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या सहकार्यातून जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवला जाईल, असे सांगून श्री. देसाई यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.