नवी दिल्ली – संसदेचे हिवाळी अधिवेशन न बोलावण्याच्या निर्णयावरून कॉंग्रेसने मंगळवारी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. त्या निर्णयामुळे संसदीय लोकशाहीच्या नाशाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया कॉंग्रेसकडून देण्यात आली.
करोना संकटकाळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा होऊ शकतात. शाळा सुरू केल्या जाऊ शकतात. बिहार आणि बंगालमध्ये निवडणूक सभा होऊ शकतात. मग, संसदेचे हिवाळी अधिवेशन का नाही? संसदेत जनतेशी निगडीत मुद्देच उपस्थित होऊ शकणार नसतील; तर लोकशाहीला अर्थ काय, असे सवाल कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी विचारले.
कॉंग्रेस पक्षाच्या ट्विटर हॅंडलवरूनही मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला. केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यांवर उतरून संघर्ष करत आहेत.
मात्र, जबाबदारीपासून पळ काढण्यासाठी सरकार अधिवेशन रद्द करत आहे, असे कॉंग्रेसने म्हटले. तर, शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा टाळण्यासाठी तो निर्णय घेण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते जयवीर शेरगिल यांनी केला.