शहराच्या विद्रुपीकरणात वाढ; वाहनमालकांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी
पिंपळे निलख – पोलीस स्टेशन कारवाईत जप्त करण्यात आलेली व नागरिकांनी बेवारस सोडून दिलेली वाहनांचा प्रश्न शहरात गंभीर होत चालला आहे. शहरात बहुतांश सर्व रस्त्यांच्या कडेला बेवारस वाहने पडून आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यास बाधा पोहोचत असून अशा बेवारस वाहनमालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
विविध ठिकाणी पोलीस कारवाईमध्ये जप्त केलेली वाहने वर्षानुवर्षे पडून आहेत. काही वाहने नागरिकांनी कालबाह्य झाल्यानंतर रस्त्यावर बेवारस सोडून दिली आहेत. तर काही ठिकाणी नवीन वाहने झाडाझुडुपांमध्ये टाकून दिल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन व नागरिकांच्या डोक्याला त्रास वाढला आहे. सांगवी, पिंपळे निलख, कासारवाडी इत्यादी ठिकाणी अनेक वर्षांपासून बेवारस वाहने उभी किंवा रस्त्याच्या कडेला अक्षरशः फेकून देण्यात आली आहेत.
शहरातील सांगवी पोलीस स्टेशन समोर एका रांगेत व मुख्य रस्त्यावर महागड्या कार तसेच इतर अनेक वाहने वर्षानुवर्षे उभी असून धूळ, गवत, झुडपे वाढून अस्वच्छता तसेच अडथळा होईल, अशी पडून असल्याने ही वाहने उचलण्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर दुतर्फा होणारी अवैध्य पार्किंग तसेच धूळ खात पडून असलेल्या वाहनांचा प्रश्न कायम आहे.
सांगवी परिसरातील एम. एस. काटे चौक, जुनी सांगवी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र रस्त्यावर तसेच सांगवी पोलीस स्टेशनच्या समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर अशी अनेक बेवारस वाहने वर्षानुवर्षे पडून असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. या बेवारस वाहनांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशी कालबाह्य झालेली व विना वापरातील वाहनांकडे पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन लक्ष का देत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंपळे निलख येथील मानकर चौकात गेली अनेक वर्षांपासून बेवारस वाहने धोकादायक पद्धतीने रस्त्यावर पडून आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पिंपळे निलख व परिसरात बेवारस वाहन परिसरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी बेवारस वाहने सोडून अथवा टाकून दिलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. या शहराचे व परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्या जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाहतूक कोंडीत पडतेय भर
शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये तसेच रस्त्यांवर बेवारस वाहने पडून आहेत. त्यामुळे शहरात सकाळी व सायंकाळच्या वेळी वाहनचालकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या हौशेने आणि सोयीसाठी नागरिक हजारो रुपये खर्च करून गाडी विकत घेतात. परंतु तेच वाहन निरोपयोगी झाले अथवा वाहनात मोठा बिघाड झाला की रस्त्यावर बेवारस सोडून देण्याची मानसिकता नागरिकांमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे. पिंपळे निलखमधील अनेक भागात विविध प्रकारचे वाहने अनेक ठिकाणी बेवारस अवस्थेत दिसून येत आहेत. मानकर चौक हा परिसर व मुख्य रस्ता हिंजवडी आयटी पार्क व मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेला जोडणारा भाग असून येथील रस्त्यावर सतत रहदारी व गर्दी असते तसेच या रस्त्यावर पडून असलेली वाहने रहदारीस व वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
वाहतूक विभागाचे दुर्लक्ष
बेवारस वाहने शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर पडून आहेत. परंतु आरटीओ पोलीस प्रसशासनास ही स्थिती दिसून येत नाही का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सांगवी येथील मुख्य बस स्थानक, विशालनगर, नवीन डीपी रोड, जगताप डेअरी, मानकर चौक आदी परिसरांत बेवारस वाहने रस्त्याच्या कडेला व रस्त्यात पडून आहेत. परंतु वाहतूक नियंत्रण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. तसेच शहराचे विद्रुपीकरण होण्यास अशी वाहने कारणीभूत ठरत आहेत. अनेक ठिकाणी पडलेली ही बेवारस वाहने सध्या नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.