कर्जत (योगेश गांगर्डे) – कर्जत शहरातील राजीव गांधी नगर, यासीन नगर, अक्काबाई नगर, सिद्धार्थ नगर, अण्णाभाऊ साठे नगर, अत्तार गल्ली, बर्गेवाडी, गायकरवाडी, जोगेश्वरवाडी, लहुजी नगर, माळी गल्ली, शाहू कॉलनी या भागातील ज्या शासकीय जागांवर अनेक नागरिक २०११ पूर्वी अतिक्रमण करून राहत आहेत. अशा नागरिकांच्या जागा व घरे नियमाकुल करण्यासाठी आमदार रोहित पवार मागील वर्षभरापासून प्रयत्नशील होते. आता त्या प्रयत्नास यश मिळत असून या भागातील नागरिकांच्या जागांची मोजणी करण्यासाठी नगरपंचायतचे पथक तसेच आमदार रोहित पवार यांनी कागदपत्रे व मोजणी कामासाठी एजन्सी उपलब्ध करून दिली आहे. अतिक्रमण केलेल्या जागा नियमाकुल करण्यासंदर्भातील बैठक नुकतीच कर्जतमध्ये पार पडली आहे.
शासन निर्णयानुसार ५०० ते १५०० स्क्वेअर फुटच्या जागा नियमाकूल करण्यात येणार असून ५०० स्क्वेअर फुटच्या पुढील जागांसाठी शासकीय रेडीरेकनरनुसार शुल्क भरून सदर अतिक्रमण नागरिकांना नियमाकुल करता येणार आहे. शहरातील नागरिकांच्या राहत्या जागांचा प्रश्न यामुळे सुटणार असून ही योजना पहिल्यांदाच कर्जत नगरपंचायत हद्दीत राबवली जात आहे. यामध्ये मागासवर्गीय व आदिवासी या प्रवर्गासाठी कसलेही शुल्क लागू राहणार नाही. या योजनेचा लाभ जवळपास २००० कुटुंबांना होणार आहे. तसेच आता अतिक्रमण नियमातून होणार असल्याने त्या ठिकाणच्या नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच संबंधित जागेवर घरबांधणी करता व इतर कामासाठी कर्जही उपलब्ध होऊ शकणार आहे.
आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी सर्व समितीचे सभापती व सर्व नगरसेवक यांनी केले होते. अशा प्रकारचे लाभ अनेक नागरिकांना घेता येणार आहे. त्यामुळे नागरिकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
सदरील बैठकीला उपविभागीय अधिकारी श्री.अजित थोरबोले, नगराध्यक्षा उषाताई राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणीताई घुले, उपगटनेते सतीश पाटील, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, सभापती भास्कर भैलुमे सभापती ज्योतीताई शेळके, उपसभापती लंकाताई खरात, ताराबाई कुलथे, मोनाली तोटे, सुवर्णा सुपेकर, मोहिनी पिसाळ, स्वीकृत नगरसेवक रज्जाक भाई झारेकरी यांची उपस्थिती होती. तसेच त्यांनी यावेळी संबंधित बैठकीत सहकार्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.