पिंपरी – करोनामुळे शहरामध्ये वाढत असलेल्या मृत्यूंसाठी वैद्यकीय साधनांची कमतरता व अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे का, याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी दक्षता समितीचे पुणे जिल्हा सदस्य ऍड. सागर चरण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
याची दखल घेत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला पुढील कार्यवाहीसाठी पत्र पाठविले आहे.
करोनामुळे शहरात मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत ऍड. चरण यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महापालिका रुग्णालयांमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे प्रमाण जास्त आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे.