नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारी केलेल्या भाषणावरून सरकार कायदे मागे घेण्यास उत्सुक दिसत नाही. त्यामुळे आम्हीही दीर्घकाळ संघर्ष करायला तयार आहोत, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी शनिवारी मांडली.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे सदस्य आणि भारतीय किसान युनियनचे (धकुंडा) सरचिटणीस जगमोहनसिंग म्हणाले, पंतप्रधानांच्या भाषणावरून ते कायदा मागे घेतील, असे वाटत नाही. मात्र, हे कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही दिल्लीच्या सीमा सोडणार नाही. आमचा पहिला लढा गैरसंसदीय पध्दतीच्या विरोधात सुरू आहे.
त्यांनी कोणतीही सल्लामसलत न करता आधी कायदे केले. त्यानंतर ते म्हणतात, ते कायदे आमच्या भल्यासाठी आहेत. नंतर म्हणतात त्यात आम्ही सुधारणा करू पण कायदे मागे घेणार नाही. मग तुम्ही असे कायदे का केले? असा सवाल त्यांनी केला.
बिकेयुचे हरियाणातील अध्यक्ष गुरनामसिंग म्हणाले, ते वारंवार आमच्याकडे वेळ आणि प्रस्ताव मागत आहेत. पण त्यांनी आमच्याकडे अद्याप कोणताही ठोस प्रस्ताव दिला नाही. जर त्यांचा हेतू चांगला असता तर त्यांनी हे कायदेच केले नसते. आता त्यात सुधारणा करून फायदा काय? जोपर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत आम्ही लढा सुरू ठेवू.
समन्वय समितीचे सदस्य आणि केरळचे माजी आमदार पी. कृष्ण प्रसाद म्हणाले, पंतप्रधानांच्या भूमिकेमुळे ते शेतकऱ्यांच्या बाजूने असणाऱ्या सहकाऱ्यांपासून दूर जात आहेत. आमचा लढा धोरणासाठी सुरू आहे. निधीसाठी नाही. त्यामुळे दीर्घकाळ आंदोलन सुरू ठेवण्यास आम्ही तयार आहोत.
पंजाब खेत मजदूर युनियनचे सरचिटणीस लक्ष्मणसिंग सेवेवाला म्हणाले, पंतप्रधान हे उद्योगपतींच्या तावडीत सापडले आहेत. त्यामुळे ते नागरिकांना त्रास देत आहेत.
खलीस्तानी किंवा दहशतवादी संबोधून ते आमची चळवळ मोडू पहात आहेत. ते निधी संकलनाचा मुद्दाही वारंवार उपस्थित करत आहेत. मात्र पंतप्रधान वारंवार उद्योगसमुहांच्या बाजूने असल्याचे दाखवून देत आहेत. त्याविरोधातच आमची निदर्शने सुरू आहेत. पण, ते आम्हाला खूष करू शकत नाहीत. ते कायदे मागे घेऊ शकत नसतील तर त्यांना मंजूर तरी का केले? असा सवाल त्यांनी केला.
विश्वास कोणावर ठेवायचा?
पाच डिसेंबरला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शांततामय मार्गाने आणि कोणत्याही राजकीय पक्षाला न घुसू देता आंदोलन करत असल्याबद्दल आमचे अभिनंदन केले होते. आता पंतप्रधान म्हणात आहेत, विरोधक आमची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा. आम्हाला दीर्घकाळ लढायला लागेल. त्याची आम्ही तयारी केली आहे, असे झंडासिंग जेथुके या शेतकरी नेत्यांनी सांगितले.