पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेत आर्थिक दुर्बल घटकांसाठी आकुर्डी (मोहननगर) व उद्यमनगर, पिंपरी येथे गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. 938 सदनिका तयार आहेत. मात्र, प्रतिसाद नसल्याने सुमारे 87 कोटींचा खर्च करून उभारलेल्या इमारतींमधील नव्या सदनिका धूळ खात पडल्या आहेत. शहरातील इतर लाभार्थ्यांना त्या सदनिका वितरित करण्याबाबत पालिका प्रशासनाची उदासीनता दिसत असून “तारीख पे तारीख” सुरू आहे.
पिंपरी महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविली. त्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने 20 जून 2017 ला मंजुरी दिली होती. या योजनेत चऱ्होलीत 1 हजार 442, रावेतमध्ये 934, बोहाडेवाडीत 1 हजार 288, आकुर्डीत 568 आणि उद्यमनगर, पिंपरीत 370 सदनिका असे एकूण 4 हजार 603 सदनिका उभारणार येणार होत्या. बोऱ्हाडेवाडी, आकुर्डी व पिंपरी येथील गृहप्रकल्पाचे 100 टक्के काम मागील वर्षी झाले आहे.
चऱ्होली गृहप्रकल्पाचे 85 टक्के काम झाले आहे. न्यायालयात प्रकरण असल्याने रावेत येथील काम बंदच आहे. चऱ्होली व बोऱ्हाडेवाडी प्रकल्प लाभार्थ्याकडून स्वहिस्सा घेण्यात आला आहे. आकुर्डी व पिंपरी हा गृहप्रकल्प रस्ते व आरक्षणात बाधित झालेल्या नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. आकुर्डीत 12 मजली 6 इमारती तर, पिंपरीत 12 मजली 2 इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र, त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण पुढे करून पालिकेने सदनिका बंद करून ठेवल्याने सदनिका धूळखात पडल्या आहेत.
पालिकेच्या पिंपरी कॅम्पातील मिलिंदनगर, लिंक रोड गृहप्रकल्पांप्रमाणे या इमारतींमधील सदनिकांचे वेळीच वितरण न झाल्यास प्रकल्पांची दुरवस्था होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच घुसखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकाही सदनिकेचे वितरण नाही
चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी व रावेत गृहप्रकल्पासाठी 5 हजार रूपयांचा डीडीसह नव्याने अर्ज मागविण्यात आले होते. त्याला शहरातून तब्बल 47 हजार 801 जण पात्र ठरले. सोडत काढून एकूण 3 हजार 664 लाभार्थ्यांची यादी जानेवारी 2021 ला अंतिम करण्यात आली. चऱ्होली व बोऱ्हाडेवाडी प्रकल्पासाठी लाभार्थ्यांनी स्वहिस्साही भरला आहे. सोडत काढून दोन वर्षे लोटले तरी, अद्याप एकाही लाभार्थ्याला सदनिका वितरित करण्यात आलेली नाही. बोऱ्हाडेवाडी प्रकल्पाचे 100 टक्के काम होऊनही सदनिका दिल्या जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान आवास योजनेत चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी दोन गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. सदनिका वितरीत करताना पूर्वी निश्चित केलेल्या प्रयोजनात बदल करण्यात येत आहे. याची फाईल राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. शासनाने मंजुरी दिल्यास तात्काळ चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी गृहप्रकल्पांतील सदनिकांचे वाटप करण्यात येईल. सध्या लाभार्थी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून पात्र लाभार्थ्यांनी स्वहिस्सा भरल्यानंतर त्यांना सदनिकांचे वितरण केले जाईल.
– शिरीष पोरेडी, कार्यकारी अभियंता, मनपा
रावेत गृहप्रकल्प; कामच सुरू नाही
रावेतमधील 934 सदनिकांचा गृहप्रकल्प जमिनीच्या मालकी वादावरून न्यायालयात अडकला आहे. असे असताना पालिकेने दोन वर्षापूर्वी सोडत काढून नागरिकांकडून प्रत्येकी 5 हजार रूपये घेऊन ठेवले आहेत. अद्यापही न्यायालयाचा वाद मिटलेला नसून कामही सुरू होऊ शकले नाही.