नवी दिल्ली – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी दोन्ही देशांचे पंतप्रधान स्टेडियमवर पोहचल्याचे पाहायला मिळालं. यावेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी आपापल्या देशाच्या कर्णधाराचा सामन्यापूर्वी विशेष कॅप देऊन सन्मान केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांची मने जिंकली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा विशेष कॅप देऊन गौरव केला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी स्टीव्ह स्मिथला या खास कसोटी सामन्याची कॅप दिली. पंतप्रधान मोदींनी स्टीव्ह स्मिथला बोलावून हात जोडून स्वागत केले तेव्हा स्मिथ आणि अल्बानीज एकमेकांमध्ये व्यस्त होते. यानंतर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनीही रोहित शर्माशी हस्तांदोलन केले आणि चौघांनीही हात वर करून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा प्रत्यय दिला.याचा व्हिडीओ समोर येताच पंतप्रधानांचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
या सामन्यात खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी खास गाडीतून स्टेडियमचा फेरफटकाही मारला. यावेळी स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते आणि प्रेक्षकांनी दोन्ही नेत्यांचे स्वागत केले. या सामन्यातील नाणेफेकीसाठी एक खास नाणे बनवण्यात आले होते, ज्यामध्ये दोन्ही देशांच्या 75 वर्षांच्या क्रिकेट स्मृतींचे चित्रण करण्यात आले होते.
— cricket fan (@cricketfanvideo) March 9, 2023
नाणेफेकीनंतर रवी शास्त्री यांनी पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना भारतीय क्रिकेटशी संबंधित खास आठवणी सांगितल्या आणि त्यांचे फोटोही दाखवले. यादरम्यान रवी शास्त्री यांनी दोन्ही नेत्यांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटशी संबंधित आठवणी सांगितल्या.