नवी दिल्ली – दिवाळीनंतर करोनाबाधित रूग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्यामुळे सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमिवर सरकारने दिलेल्या मोकळीकीचे दुष्परिणाम आता समोर येवू लागले आहे. संपूर्ण देशभरात करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. एवढेच नव्हे तर मृत्यूदर सुध्दा बळावला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (मंगळवारी) करोना रूग्णांची वाढती संख्या, उपचाराच्या सोयी आणि अन्य मुद्यांवर राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधणार आहेत.
देशाची राजधानी दिल्लीतील काही भागात सरकारने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. शिवाय कलम 144 लागू करण्यात आले आहे. यामुळे ज्या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे तेथे संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पंतप्रधानांकडून घेतला जावू शकतो किंवा संचारबंदी लागू करण्याचे अधिकार राज्यांना दिले जावू शकतात.
दरम्यान, मागील आठवड्यात करोना रूग्णांची संख्या 91 लाखावर पोहचली. आठ नोव्हेंबरनंतर दिवसाला 50 हजार रूग्ण सापडत आहेत. एकट्या दिल्लीत 6746 रूग्ण आढळून आले आहेत तर 121 जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे दिल्लीसह देशासमोरील चिंता वाढली आहे.