सुप्रीम कोर्टाला विनंती करून महाराष्ट्रावरील अन्याय दूर करावा : सुळे
पुणे – अन्य कोणत्याही वर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, हीच राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, हीच परिस्थिती तामिळनाडूतही होती मात्र, तेथील आरक्षण वैध ठरले. त्यामुळे महाराष्ट्रावर अन्याय करू नये, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाला करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
बारामती मतदारसंघातील विकासकामांसदर्भात जिल्हा परिषदेतील बैठकीनंतर सुळे पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, राज्यासह देशात करोना, बेरोजगारी, अर्थव्यवस्था याच मोठ्या समस्या आहेत. त्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे.
त्या म्हणाल्या, माझ्यासह शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना प्राप्तीकर विभागाची नोटीस आली आहे. केंद्र सरकारने त्यांचे काम केले आहे.
केंद्रानेच ड्रग्ज मुक्त भारत मोहीम सुरु करावी
राज्यात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रश्नाबाबत बोलताना म्हणाल्या, तीन महिलांना बोलावून ड्रग्जची चौकशी करून हा प्रश्न सुटणार नाही. त्या समस्येचा समूळ नायनाट केला पाहिजे. त्याकरिता पुनर्वसन केंद्रासह शालेय जीवनापासूनच त्याबाबत जनजागृती केली पाहिजे. आता केंद्र सरकारनेच ड्रग्ज मुक्त भारत मोहीम सुरु करावी, अशीही अपेक्षा सुळे यांनी व्यक्त केली.