नागपूर – पेट्रोल आणि डिजेलचे वाढते दर तसेच राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या चाललेले आंदोलन यावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. नागपूर येथे पेट्रोल आणि डिजेल दरवाढीविरोधात मोदी सरकारविरुद्ध आंदोलन करण्यात येत होते. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोऱात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली.
कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. पण पंतप्रधानांना त्याबाबत काहीच वाटत नाही. पंतप्रधानच भांडवलदारांचे गुलाम झाले असून देशातील शेतकऱ्यांनाही गुलामगिरीत ढकलण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा घणाघात थोरात यांनी केला. पण काँग्रेस मोदी सरकारला तसं करू देणार नाही”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्याच्या हातातली शेती जाणार आहे. मोठमोठे उद्योगपती कवडीमोल दरानं शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करतील आणि त्याचा हवातसा साठा करतील. यात सर्वसामान्य शेतकऱ्याचा काय फायदा होणार?, असा सवाल थोरात यांनी यावेळी उपस्थित केला.