2022 पर्यंत नवभारताच्या उभारणीसाठी सहकार्याचे आवाहन
नवी दिल्ली- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 19 तारखेला सर्व पक्षांच्या अध्यक्षांची आणि 20 जून रोजी दोन्ही सभागृहातील खासदारांची बैठक बोलावली आहे. 2022 पर्यंत नवभारताची स्थापना करण्यासाठी सामुहिकपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी सर्व पक्षांना या बैठकीमध्ये केले. “सब का साथ, सबका विकास, सबका विश्वास’ चा मतितार्थ सत्यात उतरवण्यासाठी र्व पक्षांनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
लोकसभेमध्ये 40 दिवस आणि राज्यसभेत 37 दिवसांचे अधिवेशन
पंतप्रधानांनी 19 आणि 20 जुलैला बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकांबाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना माहिती दिली. लोकसभेमध्ये 40 दिवस आणि राज्यसभेमध्ये 37 दिवस चालणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 30 सत्रांमध्ये संसदेचे काम होणार आहे. या अधिवेशनामध्ये सदस्यांचा शपथविधी, सभापतींची निवड, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार दर्शक प्रस्तावावरील चर्चा, 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचे वित्तीय विधेयक सादर केले जाणार आहे. याशिवाय प्रमुख विधेयके आणि गैरविधेयकांसाठीही वेळ राखून्ह ठेवला जाईल, असे जोशी यांनी सांगितले.
आपण सर्वजण जनतेसाठी काम करत आहोत. संसदेच्या कामकाजामध्ये अडथळे आणून आपण जनतेचे हृदय जिंकू शकणार नाही. सर्व पक्षांनी आपापसातील मतभेद दूर ठेवायला हवेत आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावायला हवा, असे पंतप्रधान म्हणाले. संसदेमध्ये नव्याने निवडून आलेल्या खासदारांचे पंतप्रधानांनी स्वागत केले. त्यांच्या माध्यमातून संसदेच्या कामकाजात नवा उत्साह संचारेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
सर्व राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्दयांवर चर्चेसाठी सरकार सकारात्मक आहे. आणि देशहिताच्या सर्व मुद्दयांवर सभागृहामध्ये चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.