6 ऑगस्टच्या स्थायी समितीत होणार चर्चा
विभागीय आयुक्तांसमोर 8 ऑगस्टला सुनावणी
नगर – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतरही हे प्रकरण ताणले जात असल्याचे दिसून येत आहे. अविश्वास ठरावबाबत अध्यक्षा शालिनी विखे यांच्या माने यांना खुलासा देण्यासाठी आज नाशिक विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतू कोणताही निर्णय न होता पुढची तारीख देण्यात आली. आता 8 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असून माने यांनी दिलेल्या लेखी म्हणण्यास आता अध्यक्षा विखे उत्तर देणार आहेत. त्यावर येत्या 6 ऑगस्टला होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती अध्यक्षा विखे यांनी दिली.
माजी सैनिकाच्या पत्नीच्या बदलीवरून माने यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून 8 जुलै रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत तो मंजूर करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात माने यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. हा ठराव मंजूर झाल्यानंतर माने पुन्हा हजर होण्याची शक्यता कमी होती. पण रजा संपल्यानंतर माने हे जिल्हा परिषद पुन्हा हजर झाले. त्यामुळे पदाधिकारी व माने असा संघर्ष सुरू झाला. त्या दरम्यान, 20 जुलै रोजी नाशिक विभागीय आयुक्तांनी अविश्वास ठराव नैसर्गिक तत्वानुसार नसल्याचे कारण देवून माने यांना म्हणणे मांडण्याची संधी न देताच हा ठराव मंजूर केल्याचा ठपका ठेवून अध्यक्षा विखे यांना खुलासा करण्याचे सांगितले होते. त्यानुसार आज नाशिक विभागीय आयुक्तांसमोर अध्यक्षा विखे यांच्यासह माने यांना आपले म्हणणे मांडण्याची सुनावणी होती.
अर्थात अध्यक्षा विखे यांनी यापूर्वी 2 ऑगस्टला पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने आपण म्हणणे मांडण्यास जावू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी आजच्या सुनावणीपूर्वीच आपले लेखी म्हणणे विभागीय आयुक्तांना पाठविले होते. त्यानुसार आज विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी झाली. अध्यक्षा विखे यांचे लेखी म्हणणे आयुक्तांना मिळाले होते. त्याप्रमाणे माने यांचे लेखी म्हणणे त्यांना मिळाले. पण माने यांनी काय लेखी म्हणणे मांडले हे अध्यक्षांना माहिती नसल्याने हे म्हणणे अध्यक्षांना मिळणे आवश्यक आहे. ते म्हणणे खोडून काढणे गरजेचे असल्याने अध्यक्षा विखेंना हे म्हणणे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावर अध्यक्षा विखे या आपले म्हणणे देणार असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. माने यांच्या लेखी म्हणण्यास अध्यक्षा विखे लेखी उत्तर देणार आहेत. त्यावर 6 ऑगस्ट होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
यापूर्वीच आपण पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने आपले म्हणणे लेखी स्वरूपात देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार हे म्हणणे पाठविले होते. परंतू मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काय म्हणणे मांडले त्याची मला कल्पना नाही. ते कळणे आवश्यक आहे. ते म्हणणे विभागीय आयुक्तांनी पाठविल्यानंतर त्यावर स्थायी समितीमध्ये चर्चा करून त्यावर उत्तर देण्यात येईल.
शालिनी विखे , जिल्हा परिषद अध्यक्षा