सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा निवडणुकीतील साताऱ्यातील उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सद्य सरकार हे लोकशाही विरोधी असल्याचे म्हंटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना बोलण्याची मुभा तरी होती परंतु सध्या आयबी, ईडी यांचाच गैरवापर होत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधत उदयनराजे भोसले यांनी, आताच्या सरकारने सामान्यांचे रोजगार हिरावून घेतला आहे, सरकारच्या कारभारामुळे अनेक जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, त्यामुळे या परिस्थितीला फक्त आणि फक्त हे सरकार जबाबदार असल्याचे म्हंटले. सद्य सरकारवर टीका करत शेतकऱ्यांना कोणीही वाली राहिला नसल्याचे त्यांनी यावेळी म्हंटले, मागील पाच वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, असे सांगत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
वर्ध्यातील सभेत शरद पवारांच्या घरी गृहयुद्ध सुरु असल्याची टीका आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यावर भाष्य करत उदयनराजे भोसले यांनी हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हणत, नको त्या गोष्टींकडे लक्ष न वळवता मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले आणि यातील किती पूर्ण केल्या? असा सवाल देखील विचारला.