मुंबई – देशात जारी केलेल्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या परवानगीमुळे गेले दोनपेक्षाही जास्त महिने ठप्प झालेल्या भारतीय क्रिकेटला सुरुवात होणार आहे. येत्या जून महिन्यापासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) आणि विविध राज्यात सराव सत्रे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिले आहेत.
केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन वाढवला असला तरीही या चौथ्या टप्प्यात काही सवलतीदेखील दिल्या आहेत. त्यानुसार देशातील विविध मैदाने, क्रीडा संकुल व मुख्य म्हणजे सराव सत्र यांवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परवाना असलेल्या व मंडळाशी तसेच विविध संघटनांशी संबंधित व्यक्ती वगळता प्रेक्षकांना प्रवेशाची मनाई करत या मैदानांवर तसेच संकुलात सराव सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. सुरक्षेची योग्य काळजी घेत तसेच प्रेक्षकांशिवाय मैदाने रिकामी ठेवून स्पर्धादेखील आयोजित करता येणार असल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यंना लवकरच दिलासादायक बातमी मिळणार आहे, अशी माहिती मंडळाने दिली आहे.
थेट स्पर्धांच्या आयोजनापूर्वी ज्या राज्यांतील संघटनांनी तयारी दाखवली तर प्रथम सराव सत्रे सुरू होतील व त्यानंतर स्पर्धांचा विचार केला जाणार आहे. मात्र, केवळ सराव सत्र सुरू करून भागणार नाहीतर त्याच्या जोडीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीदेखील पूर्ववत सुरू केली जाण्याचे मंडळाचे प्रयत्न आहेत. देशांतर्गत सामने आगामी पावसाळा पाहता लवकर सुरू होतील का, याबाबत प्रश्नचिन्ह असले तरीही आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या देशात करोनाचा धोका अल्प आहे अशा ठिकाणी स्पर्धा आयोजित करता येतील का, याचीही चाचपणी केली जात आहे. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, अमिराती व श्रीलंका यशांनी आमच्या देशात स्पर्धा आयोजित करा असा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी दिला होता, त्यावर देखील मंडळ सकारात्मक विचार करेल असेही सांगण्यात येत आहे.
आयपीएलची आशा वाढली….
सराव सत्र व एनसीए सुरू झाल्यावर रिकाम्या मैदानांवर स्पर्धा आयोजित करण्यासाठी संघ मालकांनी तयारी दाखवली तर येत्या सप्टेंबर व नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल स्पर्धेचेही आयोजन करता येऊ शकेल. रोज डबल हेडर (एकाच दिवशी दोन सामने) आयोजित करता येतील व स्थगित करण्यात आलेली आयपीएल खेळवता येणार आहे