मुंबई – राज्यातील कृषी विभागातील सर्वच बदल्या मंत्र्यांकडून नव्हे तर आयुक्तांकडून होणार आहे. महाराष्ट्राच्या कृषी विभागातील गट अ, ब, क व ड या चारही विभागातील कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार आता कृषी आयुक्तांकडे देण्यात आले आहेत. क्लास १ व क्लास २ च्या कृषी अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे.
कृषी विभागात अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी होणारे आर्थिक गैरव्यवहार थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने बदल्यांसाठी होणारे सत्तेचे विकेंद्रीकरण होत असल्याने या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. कृषी विभागातील बदल्यांसंदर्भात होणारा राजकीय हस्तक्षेपाला नियंत्रण बसणार आहे. कृषी विभागात मागेल तिथे बदलीचे धोरण मंत्रालयातून चालत असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून होतो. मर्जीतील अधिकाऱ्यांच्या हव्या असलेल्या ठिकाणी बदल्यांच्या बदल्यात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोपही झाला.
दरम्यान, आता बदल्यांसदर्भात मंत्रालयातून हालणारी सूत्रे आता आयुक्तांच्या हाती देण्यात आल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बदल्यांसाठी २००५ मध्ये राज्यात स्वतंत्र कायदा अस्तित्वात आला आहे. सध्या या कायद्याला छेद देणारा जीआर काढला गेला आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यांमुळे राज्यात वाद वाढलेला असताना हा निर्णय समोर आल्याने चर्चा रंगली आहे.