पाटण : (सूर्यकांत पाटणकर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना घरातील विजेचे दिवे बंद करून ९ मिनिटे घरातील दिवा लावा, असे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोयना जलविद्युत प्रकल्प आपली क्षमता सिद्ध करेल, असा विश्वास कोयना प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जलविद्युत प्रकल्प असल्याने कोयना प्रकल्पावर कोणताही परिणाम होणार नसून केवळ काही सेकंदात निर्माण होणारा पाँवर ग्रीड कोयना जलविद्युत प्रकल्प मेंटेन करेल, असेही अधिकार्यांनी सांगितले.
करोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनला अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील फक्त विजेचे दिवे बंद करून प्रत्येक नागरिकाने घराबाहेर दिवा लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यामुळे करोनाचा मुकाबला करणार्या देशातील डॉक्टर्स व पोलीस यंत्रणेचे मनोधर्य वाढणार आहे.
जर देशात एकाचवेळी लाईट बंद केल्यास विजेची मागणी कमी होऊ शकते. लॉकडाऊनमुळे आधीच विजेची मागणी घटली आहे. त्यामुळे वीज उत्पादन आणि पुरवठ्याचे गणित बदलले आहे. जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केल्यास अजून परिस्थिती बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास किंवा कमी झाल्यास फ्रिक्वेन्सीमध्ये अनावश्यक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्यस्थितीत महाराष्ट्र राज्याची पॉवर डिमांड ही २३ हजार मेगावाटवरून १३ हजार मेगावाट आली आहे. लॉकडाऊनमुळे इंडस्ट्रीयल लोड पूर्णतः झिरो झाले आहे. १३ हजार मेगावाट विजेवर केवळ अत्यावश्यक सेवा आणि घरगुती विजेचा लोड आहे. सर्वांनी अचानक दिवे बंद केल्यास सर्व पॉवरस्टेशन हायफ्रिक्वेन्सीवर जाऊ शकतात. परिणामी आपल्या ग्रीड मधे अनावश्यक फीडर ट्रीपिंग्स येऊ शकतात. मोठ्या प्रमाणात पॉवर डिमांड असलेल्या महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात वीज फेल्युरमुळे परिणामी सर्व पॉवर स्टेशन बंद पडल्यास मल्टी स्टेट ग्रीड फेल्युर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवा, हॉस्पिटल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, एक पॉवर स्टेशन सर्व्हिसमध्ये यायला साधारणतः १२ ते १६ तास लागू शकतात, असा धोका ही महापारेषन कंपनीकडून व्यक्त करण्यात येत आहे.
देशातील औष्णिक वीजनिर्मितीचे केंद्र बंद करता येणार नसल्याने कोयना प्रकल्पावर याचा भार येणार आहे. मात्र, कोयना जलविद्युत असल्याने कोणताही परिणाम होणार नसून केवळ काही सेकंदात निर्माण होणारा पाँवर ग्रिड कोयना जलविद्युत प्रकल्प मेंटेन करेल, असे वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले. यासाठी ऊर्जा खात्याच्या सूचनेनुसार कोयना जलविद्युत प्रकल्पातील वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण काळात तांत्रिक घडामोडींवर लक्ष ठेवून असणार आहेत.