श्रीक्षेत्र आळंदी – माउलींनी श्री ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मराठी वाङ्मयाला सुरेख साजशृंगार चढवून अलंकारयुक्त केले आहे. ज्ञानेश्वरीतील शब्दांचे सौंदर्यसामर्थ्य हे शृंगार रसालाही जिंकणारे आहे, असे प्रतिपादन ह.भ.प सुरेश महाराज सुळ यांनी विभूतीयोग या दहाव्या अध्यायावर निरुपण केले.
देशियेचेनि नागरपणे ।
शांतु शृंगाराते जिणे ।
तरि ओंविया होती लेणे ।
साहित्यासी ।।
देशाच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभवात वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा आहे. वारकऱ्यांच्या या योगदानाचा विचार शासनाने करावा हीच प्रामाणिक अपेक्षा आहे. या आषाढी वारीच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे चिंतन रोज आपण श्रवण करत आहोत . विश्वाची ज्ञानाची भूक भागविण्याची ताकद ज्ञानेश्वरीत आहे. शास्त्राचा अनुवाद सांगतो तो शास्त्री आणि अनुभव सांगतो तो संत असे सांगून ते म्हणाले, माउलींनी दहाव्या अध्यायात भगवान परमात्मा यांनी सांगितलेल्या विभूतींचा विचार मांडतात.
“विभूती’ शब्दाचा अर्थ होतो ओज, तेज, प्रभा! ज्यामध्ये परमात्म्याचे विशेष स्वरूपात वास्तव्य आहे त्याला विभूती असे म्हणतात. विभूतीचे प्रकार आहेत. या अध्यायाच्या प्रारंभाला ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरू देवांना संस्कृतप्रचुर शब्दांद्वारे नमन करतात हा अध्याय म्हणजे भोग योगातून ईशयोगाकडे जाण्याची पथदर्शिकाच नव्हे तर या सृष्टीकडे मांगल्याने पाहण्याची व निसर्गाशी संवेदनात्मक नातं जोडण्याची प्रेरणा देणारा हा अध्याय आहे. सृष्टीच्या वैभवाचे वर्णन म्हणजे विभूतीयोग होय! ज्ञानी महात्म्यांचा या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या अध्यायात लक्षात येतो.
अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर या अध्यायात स्पष्टपणे प्रभुवर्णन व गुप्त रूपाने भक्त वर्णन आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. माउलींनी संस्कृत भाषेतील गीतेवर टीका करुन प्राकृत मराठी भाषेत भगवत गितेचे सार मांडले आहे. हा ग्रंथ मराठी वाङ्मयाला मिळालेला अलंकार आहे.
विभूतीयोगाद्वारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात या चराचरामध्ये मीच भरलेलो आहे. तुला माझे दर्शन घ्यायचे असेल तर माझ्या विभूतीमध्ये तुला माझे रूप पाहावे लागेल. या कार्यक्रमाचे निवेदन ह.भ.प स्वामीराज भिसे यांनी केले.