वाहन उद्योगाकडून करोनाच्या परिणामांचे मूल्यांकन
पुणे – करोनामुळे वाहन उद्योगावर परिणाम होणे आता अटळ झाले आहे. कोणत्या कंपन्यावर हा परिणाम किती काळ टिकेल आणि त्याचे आर्थिक दुष्परिणाम काय होतील, याचे मूल्यांकन करण्याचे काम सुरू असल्याचे वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या “सिआम’ने म्हटले आहे.
करोना संसर्ग होण्याआधी चीनमध्ये मोठी वार्षिक सुट्टी होते. त्यामुळे वाहन उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात आयात करून त्याचा राखीव साठा तयार केला होता. नंतर करोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ही आयात पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे बीएस-6 या वाहन प्रकारासाठी नवे सुटे भाग मिळणे अशक्य होणार आहे असे संघटनेचे अध्यक्ष राजन वडेरा यांनी सांगितले.
करोनाचा केवळ प्रवासी वाहन उत्पादनावरच नाहीतर दुचाकी, तीनचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे. सध्या भारतातील कंपन्यांना पर्यायी देशातून माल उपलब्ध करणे अवघड जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात काय उपाययोजना करता येतील, याकरिता केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत असे ते म्हणाले.