पुणे – राज्यातील यंदाचा गळीत हंगाम विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील हंगाम विधानसभा निवडणुकीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. सहकार लॉबीचे राजकारणाशी असलेले जवळचे संबंध आणि राज्यातील निवडणुकीचे चित्र पाहता गळीत हंगाम लांबण्याचीच शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्राला अतिवृष्टीबरोबरच महापूराचा फटका बसला. साताऱ्याच्या तुलनेत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ऊस पिकाची मोठी हानी झाली आहे. उसाचा फड पाण्यात राहिल्याने साखरेचा अपेक्षित उतारा मिळणार नसल्याने ऑक्टोबरमध्ये कारखान्यांची धुराडी पेटविणे परवडणारे नाही. ही बाब गळीताचे वेळापत्रक बिघडविणारी आहे. त्यातच यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील 16 साखर कारखाने सहभागी होण्याची शक्यता आहे. यंदाचा हंगाम 15 डिसेंबरपासून सुरू करण्याची मागणी सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने साखर कारखाना संचालक मंडळाचे निम्मे-अधिक लक्ष या निवडणुकांवरच
आहे.