कराड -बिहारच्या निवडणुकीत भाजपाने करोना लस फुकट देण्याचे दिलेले आश्वासन चुकीचे असून याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच केंद्राने कृषी सुधारणेच्या शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तीनही कायदे रद्द करावेत, अशी मागणी कॉंग्रेसने केली असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यातील भाजपचे वर्चस्व संपवण्यासाठी प्रत्नशील असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, कराड तालुक्यात 1 हजार 48 हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. जुन्या शासन निर्णयानुसार सुमारे 1 कोटी 17 लाख भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर नवीन आदेशानुसार 2 कोटी रूपयांपर्यत भरपाई मिळणार असल्याचेही आ. चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, शिवराज मोरे, नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, इंद्रजित गुजर, जि. प. सदस्य निवास थोरात, पं. स. सदस्य नामदेव पाटील, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, तालुका कृृृषी अधिकारी रियाज मुल्ला यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आ. चव्हाण म्हणाले, करोना महामारीच्या काळात बिहार निवडणुकीत केंद्र सरकारकडून पक्षपातीपणा सुरू आहे. परंतु, केंद्राला अशा पध्दतीने भेदभाव करता येणार नाही. या निवडणुकीत मते मिळवण्यासाठी बिहारच्या जनतेला करोनाची लस फुकट टोचण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. अशा पध्दतीने मतदारांना प्रलोभण देणे चुकीचे आहे.
केंद्राने राज्यसभेत बहुमत नसताना तसेच देशभरातील नोंदणीकृत 250 शेतकरी संघटनांशी कोणतीही चर्चा न करताच कृषी सुधारणेच्या नावाखाली पूर्वीचे कायदे बदलून नवीन तीन कायदे आणले आहेत. हे कायदे शेतकऱ्याला उध्वस्त करणारे आहेत. त्यामुळे ते रद्द करण्यात यावेत. यासाठी 2 कोटी शेतकऱ्यांच्या सहीचे निवेदन राष्ट्रपतींना देणार आहे. पंजाब सरकारने या कायद्यांना शह देण्यासाठी राज्याने स्वतंत्र कायदे केले आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.
ते म्हणाले, जगभरात पाचव्या स्थानावर असलेली भारताच्या अर्थव्यवस्थेत कमालीची घसरण झाली आहे. यासाठी फक्त करोना महामारीच जबाबदार आहे, असे नसून आत्तापर्यंत मोदी सरकारने घेतलेले निर्णयही कारणीभूत ठरले आहेत. यात नोटबंदी, जीएसटीसारखे निर्णय अर्थव्यवस्था खिळखीळ करण्यासाठी जबाबदार ठरले आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात दरडोई उत्पन्न जूनअखेर 24 टक्क्यांनी घसरले आहे.
ऍड. उदयसिंहांबाबत लवकर निर्णय
राष्ट्रवादीने भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांना पक्षात प्रवेश दिला आहे. यानिर्णयाचा महाविकास आघाडीला नक्कीच फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात ठिकठिकाणी अनेकजण कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत. सातारा जिल्ह्यातही कॉंग्रेसला बळ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा कॉंग्रेस कमिटीची बांधणी सुरू आहे. याच दरम्यान, ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे कॉंग्रेसमध्ये सक्रीय होणार असल्याची चर्चा असून याबाबत आपली काय भूमिका आहे. या प्रश्नावर आ. चव्हाण म्हणाले, तुम्हाला चार दिवसात याबाबत काय ते कळेल असे सूचक विधान केले.
“त्या’ सत्कार समांरभाची चौकशी होणार
करोना अजून संपलेला नाही. लोकांनी निष्काळजी राहू नये. तसेच करोनाची दुसरी लाट येणार नाही, असे समजू नये. असे सांगत आ. चव्हाण यांनी सप्टेंबर महिन्यात करोनाचे संक्रमण वाढल्याचे सांगितले. याचदरम्यान वाढत्या संक्रमण काळात येथील टाऊन हॉलमध्ये जंगी सत्कार समारंभ झाला. त्यामुळे अधिकाऱ्यांना वेगळा न्याय आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना आ. चव्हाण यांनी या प्रकरणाची जिल्हाधिकारी यांच्या मार्फत चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले.