-हेमंत देसाई
महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष आता अत्यंत टोकाला पोहोचला असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आमने सामने आले आहेत.
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड दिला. त्यानंतर विधानसभेत केलेल्या भाषणात, भाजपमधील अनेकजण आमच्याकडे येण्यास उत्सुक आहेत. त्यांना सांभाळा, असा गर्भित इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. त्यावर, आमच्याकडील 105 पैकी एकही आमदार फुटणार नाही, असे प्रत्युत्तर भाजप पदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पक्षांतर्गत कोंडी असह्य होऊन, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अलीकडेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाचा मोठा सोहळा झाला, “तेव्हा माझ्यामागे ईडी लावल्यास मी सीडी बाहेर काढेन’, असा इशारा खडसे यांनी दिला होता. परंतु ते सीडी बाहेर काढतात की नाही, याची तमा न बाळगता पुण्यातील भोसरी येथील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय ऊर्फ ईडीने त्यांना नोटीस पाठवली आहे.
भाजपशी युती तोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेससमवेत महाविकास आघाडी सरकार स्थापण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे आणि भाजपवर रोजच्या रोज हल्ला चढवणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांनाही ईडीने नोटीस धाडून चौकशीसाठी बोलावले आहे. पीएमसी बॅंक गैरव्यवहार प्रकरणीही नोटीस देण्यात आली आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत व प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा यांना नोटीस पाठवली.
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्या मुलांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. कंगना राणावत प्रकरणी सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. सरनाईक यांना नोटीस आली, तेव्हा त्यांच्याविरुद्ध काही निराधार आरोप माध्यमांमार्फत करण्यात आले. शेवटी, माझ्याविरुद्ध अशा बातम्या देणाऱ्यांवर मानहानीचा खटला भरण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. परंतु त्यावेळी जेवढी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली नव्हती. तेवढी आक्रमक भूमिका शिवसेनेने आता घेतली आहे. संजय राऊत यांनी शिवसेना भवनातच पत्रकार परिषद घेऊन, “हवं तर घरी येऊन मला अटक करा. पण आम्ही घाबरणार नाही. भाजपच्या अनेक नेत्यांच्या अमाप संपत्तीचा तपशील माझ्याकडे आहे हे प्रकरण तुम्हाला महागात पडेल’, अशी गर्जनाच केली.
बायकांच्या पदराआडून हा हल्ला करण्यात आला असून, हा नामर्दपणा आहे. एचडीआयएल कंपनीने भाजपलाच वीस कोटी रुपये दिले आहेत. भाजपच्या नेत्यांना ईडीमधूनच माहिती पुरवली जात आहे, असे आरोप संजय राऊत यांनी केले. एवढेच नव्हे, तर ईडीच्या कार्यालयासमोर “भाजपचे प्रदेश कार्यालय’ असे बॅनर लावून, शिवसैनिकांनी ईडीविरुद्ध मोहीम उघडली आहे. ईडीविरुद्ध तेथे जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यापूर्वी शरद पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, तेव्हादेखील मुंबईत असेच नाट्य घडले होते. वर्षभरानंतरच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका असून, त्यामुळे सेना-भाजप चकमकी वाढणारच आहेत. परंतु या सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक संजय राऊत हे बनले असून, याची नोंद घ्यावी लागेल.
भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे आणि यूपीएचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे सोपवले पाहिजे, असा सल्ला नुकताच राऊत यांनी दिला. “शिवसेना हा यूपीएचा भाग नाही, तेव्हा आमचे नेतृत्व कोणी करावे याबाबत सेनेने सल्ला देऊ नये,’ असा टोला सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मारला आहे. वास्तविक खुद्द पवार यांनीदेखील आपण यूपीएचे नेतृत्व करणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. तरीदेखील राऊतकृत पवारस्तवन सुरूच आहे. यापूर्वी राऊत यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने करून, पक्षाला संकटात टाकले आहे.
अभिनेत्री कंगना राणावतला आक्षेपार्ह संबोधले होते. यावर टीका होताच, त्या शब्दाचा अर्थ “नॉटी’ असा होतो, असा युक्तिवाद राऊत यांनी केला होता. डॉक्टर्सना काही कळत नाही, कंपाउंडर्सना कळते, असे उद्गार त्यांनी काढल्यानंतर, देशभरातील डॉक्टरांनी त्यांचा निषेध केला होता. मुस्लिमांचा मतदानहक्क काहीकाळ स्थगित ठेवावा, अशी घटनाविरोधी मागणीही त्यांनी केली होती. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली, त्यामुळे राऊत उखडले. परंतु खुद्द राऊत यांनी अहमदाबादचा उल्लेख “मिनी पाकिस्तान’ असा केला होता. उदयनराजे भोसले यांच्याबाबतही गैरउद्गार संजय राऊत यांनी काढले होते. राऊत यांच्या निषेधार्थ सांगली-सातारा बंद पाळण्यात आला होता.
संजय राऊत यांच्या विधानाबद्दल मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना अनेकदा खुलासे करावे लागले आहेत. शिवसेनेच्या भूमिकेशी विसंगत असलेले लेखनही शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये येत असते. भाजप-शिवसेना युती असतानादेखील शिवसेनेच्या मुखपत्रामधील राऊतांच्या लेखनामुळे भाजप नेते संतापत आणि त्याबद्दल कधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व कधी उद्धव ठाकरे यांना खुलासे करावे लागत असत.
बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, जयपाल रेड्डी, नवाब मलिक यांच्यासारख्या अनेक अनुभवी नेत्यांनीही प्रवक्ता म्हणून काम केले आहे. परंतु त्यांच्या वागण्याबोलण्याच्या शैलीत सुसंस्कृतपणा व प्रगल्भता होती. तसेच मर्यादाचे भानही होते. मात्र समोर कॅमेरा असला, की संयम सुटून बोलणाऱ्या नेत्यांची संख्या अलीकडे वाढली आहे.