पुणे – आमदार मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनानंतर कसबा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुक जाहीर झाली. यानंतर भाजपने हेमंत रासने यांच्या रूपात आपला उमेदवार घोषित केला. यामुळे टिळक कुटुंबियांकडून नाराजीचा स्वर उमटल्याचे पाहायला मिळाले.काँग्रेससह महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल ७याचे चित्र देखील लवकरच स्पष्ट होणार आहे. अशात कसबा पेठ भागात काही बॅनर्स झळकल्याने नवीन चर्चाना उधाण आले आहे.
चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने उणेद्वारांची घोषणा केली. चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्याच घरात उमेदवारी दिली मात्र कसब्यातून मुक्ता टिळक यांच्या घरात उमेदवारी न देता बदल करण्यात आला. यानंतर कसब्यात मतदारांना उद्देशून काही फलकबाजी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
“कुलकर्णींचा मतदारसंघ गेला. टिळकांचा मतदारसंघ गेला. आता नंबर बापटांचा का?” असा सवाल बॅनरद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. या बॅनर्सची जोरदार चर्चा सध्या सुरु झाली आहे. हे बॅनर्स नेमके कोणी लावले हे समजू शकलेलं नसलं तरी यामुळे आता राजकीय वातवरण तापायला सुरुवात झाली आहे.
समाज कुठवर सहन करणार ? एक जागरूक मतदार असा आशय देखील बॅनरवर पाहायला मिळतो. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशी बॅनरबाजी सुरु झाल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढू शकते. महाविकास आघाडी आता या निवडणुकीबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.