हवेली तालुक्यात सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचे वारे जोरात वाहत आहे. यामध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये अनेक गावच्या आजी – माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे प्रतिनिधी आदींनी पक्षप्रवेश केला आहे. विधानसभेच्या तोंडावर पक्षफुटीचे पेव फुटले आहे.
पक्षप्रवेशामुळे एकीकडे शिवसेना आणि भाजपच्या गोटात आनंदाचे तर कॉंग्रेस, मनसे, राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. शिरूर – हवेलीसाठी राष्ट्रवादीमध्ये माजी आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांना मानणारे दोन वेगवेगळे गट तयार झाले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीत गट, तट वाढताना दिसत आहे. दुसरीकडे विधानसभेत तीव्र सत्तासंघर्ष पाहायला मिळणार आहे. आमदार बाबुराव पाचर्णे यांना यावेळी भाजपमध्ये पक्ष प्रवेश होत असल्याने ताकद वाढवून ते बांधणी मजबूत होत आहे. शिवसेनेचे उपनेते, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून राजकीय समीकरण बदलून टाकण्याचे सूतोवाच दिले आहे.
नव्याने शिरूर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके हे मतदारसंघापासून अनेक गावच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेत आहेत. त्यामुळे साधी वाटणारी राजकीय समीकरणे अजून गुंतागुंतीची होऊ लागली आहे.