नवी दिल्ली – जुनी वाहने मोडीत काढण्याचे धोरण तयार झाले असून या विषयाशी संबंध असलेल्या विभागांशी चर्चा चालू आहे.
भारतात बरीच जुनी वाहने रस्त्यावर आहेत. त्यामुळे उत्सर्जन होते. यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित वाहनांची विक्री वाढावी याकरिता जुनी वाहने मोडीत काढण्याचे धोरण केंद्र सरकार तयार करीत आहे. मात्र, जुन्या वाहनात ग्राहकांनी गुंतवणूक केलेली असल्यामुळे त्यांना नवे वाहन खरेदी करताना काही प्रमाणात उत्तेजनाची आवश्यकता आहे. वाहन कंपन्या यामध्ये काय योगदान करणार असा सरकारचा सवाल आहे.
वाहन कंपन्यांनी नव्या वाहनावर एक टक्का सूट देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. वाहन कंपन्यांचे योगदान माहीत झाल्याशिवाय सरकार निर्णय घेणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. सध्या अवजड उद्योग, वाहतूक व पोलाद मंत्रालयादरम्यान यासंदर्भात चर्चा आहे.
सुरुवातीला ग्राहकाला स्वयंस्फूर्तपणे आणि बंधनकारक पर्यायावर विचार करण्यात आला होता. मात्र, या संदर्भातील सचिव गटाने फक्त स्वयंस्फूर्तीने नवे वाहन खरेदीचा पर्याय द्यावा असा प्रस्ताव पुढे केला होता. सरकारला यावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे. तो निर्णय झाल्यानंतर हे धोरण जाहीर करण्यात येईल.