भुईंज -खंडाळ्यात शेतकरी सभासदांच्या कारखाना उभारताना अडचणी आणल्या. कारखाना उभा राहिल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात आले. मतदारांचा कौल मान्य करुन दुसऱ्या दिवशी खंडाळा कारखाना नव्या व्यवस्थापनाच्या ताब्यात द्यायची तयारी दर्शवली. सगळं काही हाती असूनही खंडाळा बंद ठेवला. तेच आता किसन वीर कारखान्याबाबत चाललं असून हा कारखाना ताब्यात घेऊन तो केवळ कोणाच्या तरी घशात घालण्याचा डाव आखला आहे. मात्र, तो डाव कधीच यशस्वी होणार नाही, असा विश्वास किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी खंडाळा येथे व्यक्त केला.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमीत्त खंडाळा व भुईंज येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मदन भोसले म्हणाले, “किसन वीर कारखान्याला काडीची मदत तर कधी केली नाहीच. अडचणी आणून हा कारखाना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले. राज्य सहकारी बॅंकेतून मंजूर झालेलं कर्ज यांनीच रोखलं. कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे आणि माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत तो शेतकर्यांच्याच मालकीचा राहिल.” किसन वीर कारखान्याचा कारभार करताना प्रतापगड सहकारात ठेवला, खंडाळ्याचा कारखाना उभारला.
तीन डिस्टिलरी, सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल असे अनेक उपक्रम उभारले. यांनी आजपर्यंत एखादी पतसंस्था उभारली का, असा प्रश्न त्यांनी केला. प्रतापगड यांनाच हडपायचा होता. तो वाचवताना व खंडाळा उभारताना “किसन वीर’वर ताण जरुर आला. मात्र, शेजारचं घर जळत असताना बघ्याची भूमिका घेणारा मी नाही. अडचणीवर मात करण्याची धमक असून त्यामुळेच रणांगण सोडून पळून गेलो नाही, असेही त्यांनी ठणकावले.
आमदार महेश शिंदे म्हणाले, “पावणेचारशे कोटीचा जरंडेश्वर कारखाना अवघ्या कवडीमोल किमतीने घेतला. आज तोच डाव “किसन वीर’बाबत टाकला आहे. जरंडेश्वर कारखान्याची गाळप क्षमता वाढवून ती भूक भागवण्यासाठी “किसन वीर’ बंद पाडण्याची खेळी आखली आहे. त्यामुळेच गेली निवडणूक त्यांनी लढवली नाही. मदनदादांनी त्यांचे डाव आतापर्यंत हाणून पाडले. त्यांच्या जोडीला मी आलो आहे. देणी शंभर टक्के दिली जाणार आहेत. यावेळी ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, धनाजी डेरे, नारायण पवार, सीए सी. व्ही. काळे, रतनसिंह शिंदे, दत्तात्रय गाढवे, बापूराव धायगुडे, विशाल धायगुडे, हर्षवर्धन शेळके पाटील, सतीश भोसले, पं. स. सदस्य दीपक ननावरे, सुजित डेरे, दिलीप शिंदे, पै. मधुकर शिंदे, पै. जयवंत पवार, विराज शिंदे, प्रवीण जगताप, सयाजीराव पिसाळ,
अनुप सूर्यवंशी, शेखर भोसले पाटील, विजय चव्हाण, अतुल पवार, पृथ्वीराज पिसाळ, धनंजय बाबर, पै. माणिक पवार, बाबा खुडे, विशाल डेरे, अंकुश शिंदे, अनिता भासेले, पं. स. सदस्य चंद्रकांत यादव, रामदास कांबळे, बुवासाहेब पाटील, शरद देशपांडे, सी. बी. भोसले, हर्षवर्धन भोसले, साहेबराव महांगरे, बंडू राऊत, दिनकरराव राऊत आदी उपस्थित होते. खंडाळा येथील मेळाव्यात अनिरुद्ध गाढवे यांनी तर भुईंजच्या मेळाव्यात भैय्यासाहेब जाधवराव यांनी स्वागत केले.