प्रभात वृत्तसेवा, पुणे, दि. 3 -पीएमपीच्या ग्रामीण भागातील मार्गावरील फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. दि. 1 जुलैपासून 11 मार्गांवर केवळ 11 पीएमपी बस सुरू आहेत तसेच याच मार्गावरून एसटीच्या ठारावीक वेळेलाच बस धावत आहेत. एसटी आणि पीएमपीच्या वादात प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे.
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संप काळात ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा म्हणून पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागात 15 पेक्षा अधिक मार्गावर पीएमपी सेवा सुरू केली होती. या मार्गावर 47 पेक्षा अधिक पीएमपी बसेस धावत होत्या. मात्र, एप्रिल महिन्यात एसटीचा संप मिटल्यानंतर महामंडळाने पीएमपीला ग्रामीण मार्गावरील सेवा बंद करण्याबाबत पत्र पाठवले. त्यानंतर पीएमपी प्रशासनाने काही मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद केली आहे.
शहरालगतच्या ग्रामीण भागातून शहरात कामासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची तसेच विद्यार्थी संख्या अधिक आहे. मात्र, दि. 1 जुलैपासून पुणे शहरालगतच्या बहुतांशी ग्रामीण भागातील बससेवा बंद झाल्याने एसटी सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे, त्यात एसटीही वेळेत नसल्याने या प्रवाशांची गैरसोय होत आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू ठेवण्यालाच प्रशासनाचे प्राधान्य असेल. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांची मागणी होत असली तरी नवीन मार्गावर बस सेवा सुरू करण्याचा कोणताही विचार नाही.
– दत्तात्रय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक
पीएमपी सेवा
पूर्वी आणि आता
हडपसर-जेजुरी …12, 1
हडपसर-मोरगांव मार्ग..5, 1
सासवड-नीरा मार्ग….3, 1
सासवड-वीरगाव मार्ग..3, 1
यवत-सुपेगाव मार्ग..2, 1
भोसरी-जुन्नर……..3, 1
भोसरी-मंचर……… 12, 1
मंचर-घोडेगाव…… 2, 1
यवत-कुरकुंभ……..3, 1
मंचर-भीमाशंकर का. 2, 1
मांडवगण फराटा……1, 1