सांडपाण्यामुळे रस्ता खचला : ठेकेदारांचे बिल रोखले
पळसदेव (वार्ताहर)- येथे लाखो रुपये खर्च करून गटार योजना आणली. मात्र, ती व्यवस्थित न झाल्याने नागरिक सांडपाणी सरळ रस्त्यावरच सोडून देत आहेत. दररोजच्या सांडपाण्यामुळे पळसदेव ते माळेवाडी डांबरी रस्ता खराब झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. रस्त्यावरच कपडे व भांडी धुण्याचे काम होत असल्यामुळे पळसदेव ते माळेवाडी रस्त्यावर सतत पाणी येत आहे. माळेवाडी, शिंदेवस्ती, शेलारपट्टा, भावडी, आगोती, चांडगाव भागतून दररोज पळसदेव गावात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गावातील इतर भागातही गटार योजनेचे काम व्यवस्थित न झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर व मुख्य बाजारपेठेला लागून आसलेल्या रस्त्यालगत सांडपाणी रस्त्यावरच येत आहे. त्यामुळे अनेक भागात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत ग्रामपंचायत रस्त्यावर पाणी सोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत नाही. ग्रामपंचात व आरोग्य विभागाच्या वतीने फॉगिंग मशीनच्या माध्यमातून औषध फवारणी करून देखील डास कमी होत नाहीत. साथीचे आजार बळावले आहेत.गावासाठी लाखो रुपये खर्चून गटार योजना आणली. मात्र, गटारीचे काम योग्य पद्धतीने झाले नाही. गटार योजना संपूर्ण गावासाठी देखील करण्यात आली नाही. गावातील काही ठराविक प्रभागापर्यंतच मर्यादित असल्याने इतर भागातील नागरिक मात्र, सांडपाणी रस्त्यावरच सोडत आहेत.
रस्त्यावर सांडपाणी सोडू नका. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटार लाइनपर्यंत नागरिकांनी स्वतः पाईप टाकून पाणी त्यात सोडावे, असे अनेकदा सांगण्यात आले आहे. मात्र, नागरिक त्यास प्रतिसाद देत नसल्याने अडथळा होत आहे. आता ग्रामपंचायत प्रत्येकाच्या घरातील सांडपाणी गटार लाईनला जडू शकत नाही. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. गटार योजनेचे काम व्यवस्थित न करणाऱ्या संबंधित ठेकेदाराचे कामाचे बिल अडवून ठेवले आहे. काम योग्य पद्धतीने झाल्यानंतरच त्यांना कामाचे उरलेले बिल अदा करण्यात येणार आहे.
-अंजना शेलार, ग्रामपंचायत सदस्या.