मुंबई – कॉंग्रेसचे आमदार नाना पटोल यांचे मागील भाजप सरकारकडून फोन टॅपिंग केले जात असल्याच्या आरोपाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी केली आहे. पटोले म्हणाले की फडणवीस सरकारच्या काळात अनेक राजकीय नेत्यांचे व वरीष्ठ सरकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांचेही फोन टॅप केले जात होते.
या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पटोले यांनी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली असून त्याची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री वळसेपाटील यांनी आज विधानसभेत केली. या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल पुढील अधिवेशनात विधीमंडळापुढे मांडला जाईल आणि संबंधीत अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असे वळसेपाटील यांनी नमूद केले.
सुरक्षेच्या कारणासाठी ज्यांच्या फोनवर पाळत ठेवायची गरज आहे त्यांचे फोन नंबर्स आणि त्यांची नावे गृहविभागाच्या अतिरीक्त मुख्य सचिवांकडे सादर करून त्यावर शासनाची रितसर मंजुरी घेण्याची गरज असते असेही गृहमंत्र्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले.
जयंत पाटील यांनी यावर असा प्रश्न उपस्थित केला की नेमक्या किती आमदारांचे फोन टॅप केले जात होते, हे फोन टॅपिंग कोणाच्या इशाऱ्यावरून केले जात होते असा प्रश्न नाना पटोले यांनीहीं उपस्थित केला. पटोले म्हणाले की माझा फोन हा अमजद खान नावाच्या एका मादकद्रव्याचा चोरटा व्यापार करणाऱ्या इसमाचा फोन आहे असे सांगून त्यावर पाळत ठेवली गेली होती.
त्यावेळी मी खासदार होतो असेही पटोले यांनी निदर्शनाला आणून दिले. माझा फोन नंबर अमजद खान नावाच्या माणसाचा आहे असे खोटे सांगून त्यावर टॅपिंग करण्याचे कारण काय होंते असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या साऱ्या प्रकाराची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल अशी ग्वाही यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिली.