कोची -विधानसभा निवडणुकीआधी केरळमध्ये राजकीय हादरा बसलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला उच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळू शकला नाही. एनडीएच्या तीन उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवले. त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या संबंधित उमेदवारांच्या याचिका केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळल्या.
भाजपच्या दोन आणि अण्णाद्रमुकच्या एक अशा एनडीएच्या तीन उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले. अर्जांमध्ये त्रुटी असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी ते पाऊल उचलले. अर्ज फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकांवरील सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने आपली बाजू मांडली. एकदा निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी झाल्यावर न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असा युक्तिवाद आयोगाच्या वतीने करण्यात आला. तो मान्य करत न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळल्या. त्यामुळे एनडीएचे तीन उमेदवार केरळच्या निवडणूक रिंगणातून बाहेर पडले आहेत. ती घडामोड भाजपच्या दृष्टीने मोठी राजकीय पीछेहाट मानली जात आहे. केरळमध्ये भाजपची फारशी राजकीय ताकद नाही. ती वाढवण्याच्या दृष्टीने यावेळची निवडणूक त्या पक्षासाठी महत्वाची मानली जात आहे.