सुरत – बदनामीच्या एका खटल्यात सुनावणीच्यावेळी कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्यापासून राहुल गांधी यांना सुट देण्यात आली आहे. मोदी आडनावाची माणसे चोर कशी असतात असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्या अनुषंगाने गुजरात मधील एका आमदाराने त्यांच्या विरोधात बदनामीचा हा खटला दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात समन्स जारी केले होते.
त्यानुसार ते येथे हजर राहिले होते. आज या प्रकरणाची पुढील सुनावणी झाली त्यावेळी गांधी यांच्यावतीने त्यांचे वकिल किरीट पानवाला यांनी राहुल गांधी यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याच्या बंधनातून सूट मिळावी अशी मागणी न्यायालयात केली. त्यांना त्यांच्या व्यस्त राजकीय कार्यामुळे इतक्या कमी वेळात कोर्टापुढे येणे शक्य नसल्याचे त्यांनी कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिले. त्यानुसार कोर्टाने त्यांना तशी अनुमती दिली. या प्रकरणातील पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होणार आहे.