मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील जनतेने महायुतीला अतिशय स्पष्ट जनादेश दिलेला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन व्हावे, अशी सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे. पण सत्तास्थापन करण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने आम्ही आज राज्यपालांना भेटण्यास गेलो होतो, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
वर्षा बंगल्यावर बुधवारी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती “अवगत’ करून देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन व आशिष शेलार या भाजपच्या नेत्यांचा समावेश होता. राज्यपालांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी राजभवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला.
भाजप-शिवसेना महायुती सरकार 5 वर्षे एकत्र सरकार चालवते आहे. मात्र आता नवीन सरकार बनविण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीबाबत कायदेशीर आणि घटनात्मक तरतुदीबाबत चर्चा करण्यासाठी राज्यपालांची आम्ही भेट घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन व्हावे अशी सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे. पण या स्थितीत कोणते कायदेशीर मुद्दे आहेत याची राज्यपालांशी चर्चा केली. त्याचसोबत महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीचे ब्रिफिंग करण्यासाठी आम्ही गेलो होते. राज्यात सध्या नेमके काय चालले आहे यावर खूप सविस्तर चर्चा झाली. राज्यपालांशी झालेल्या चर्चेच्या आधारे पुढे काय करायचे याचा निर्णय करणार आहोत, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यास नकार दिला.
राज्यातील उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीबाबत आमचे वरिष्ठ नेते पुढील मार्ग काढतील आणि पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.