जयपूर – भारतीय जनता पक्षाकडून कॉंग्रेसचे आमदार फोडून राजस्थानातील आपले सरकार पाडण्याचा कसोशिचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप त्या राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे. राज्यात करोना रोगाचा वाढता प्रसार सुरू असताना राजस्थानात हे अमानवीय उद्योग सुरू आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. तथापि, आपले सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या या कृत्यावर मुख्यमंत्री गहलोत यांनी आज पत्रकार परिषेदत जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले आहे की भाजपने सारीच लाज सोडली असून राजकारणाचे त्यांनी बकरा मंडी करून टाकले आहे. तथापि, राज्यातील कॉंग्रेसचे सरकार स्थीर असून ते स्थीरच राहील आणि आपला निर्धारित कालावधी पूर्ण करेल असा, विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सरकार पाडण्याच्या प्रयत्नात भाजपचे विधानसभेतील नेते गुलाबचंद कटारिया, उपनेते राजेंद्र राठोड आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सतीश पुनिया हे प्रयत्नशील आहेत असा आरोप त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाने मध्यप्रदेश सह अन्य राज्यांतील सरकारे अशाच घोडेबाजारातून पाडली आहेत. त्यांना हाच प्रयोग राजस्थानात करायचा आहे असा आरोप गहलोत यांनी केला. भाजपच्या या घोडेबाजाराच्या राजकारणाला देशातील जनता योग्य वेळी उत्तर देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.