नवी दिल्ली – संघर्ष आणि नैराश्याच्या परिस्थितीत श्रीमद् भगवद्गीतेचा जन्म झाला आणि सध्या संपूर्ण मानवता त्याच प्रकारच्या संघर्षमय आणि आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत आहे. भगवद्गीता हा औदासिन्याकडून विजयाकडे नेणाऱ्या विचारांचा खजिना आहे.
सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण विश्व एका अत्यंत मोठ्या जागतिक महामारीच्या आपत्तीत सापडलेले आहे आणि त्या महामारीच्या खोलवर जाणवणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक परिणामांना तोंड देण्यासाठी झगडत आहे, अशा परिस्थितीतून सावरण्यासाठी श्रीमद् भगवद्गीतेने दाखविलेला मार्ग अत्यंत समर्पक आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
भगवद्गीतेच्या श्लोकांच्या स्वामी चिद्भवानंदजी यांनी संपादित केलेल्या किंडल आवृत्तीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे आज त्यांनी प्रकाशन केले. त्यावेळी ते बोलत होते. भगवद्गीतेची ई-आवृत्ती तयार करण्यासाठी सर्व संबंधितांनी घेतलेल्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले. परंपरा आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या या आवृत्तीमुळे अधिकाधिक युवक गीतेच्या उदात्त विचारांशी जोडले जातील असे ते म्हणाले.
जीवनात देशाला इतर सर्व गोष्टींपेक्षा सर्वोच्च स्थानी ठेवण्यास सांगणाऱ्या आणि देशवासीयांच्या सेवेचा उपदेश देणाऱ्या, स्वामी विवेकानंद यांच्या मद्रास येथे दिलेल्या व्याख्यानांमुळे स्वामी चिद्भवानंदजी यांना मोठी प्रेरणा मिळाली. एकीकडे स्वामी चिद्भवानंदजी स्वामी विवेकानंद यांच्याकडून प्रेरित झाले तर दुसरीकडे त्यांनी त्यांच्या कार्यातून संपूर्ण जगाला प्रेरित केले.
समाजसेवा, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये रामकृष्ण मिशन करीत असलेले कार्य तसेच स्वामी चिद्भवानंदजी यांचे महान कार्य पुढे नेण्यासाठी मिशन घेत असलेली मेहनत अत्यंत कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.
सक्रिय राहणे हा मुख्य संदेश…
निष्क्रियतेपेक्षा कृती करीत राहणे हा श्रीमद् भगवद्गीतेने दिलेला मुख्य संदेश आहे. त्याच प्रकारे, आत्मनिर्भर भारत अभियानाचा गाभा हा फक्त स्वतःसाठी नव्हे तर मोठ्या प्रमाणावर मानवतेचे कल्याण साधण्यासाठी संपत्ती आणि मूल्ये निर्माण करण्याचा मार्ग आहे. गीतेतील विचारांना अनुसरत ज्या पद्धतीने आपल्या शास्त्रज्ञांनी संपूर्ण मानवजातीला मदत करून रोगमुक्त करण्यासाठी अत्यंत कमी काळात लस शोधून काढली त्याची त्यांनी आठवण करून दिली.