वंचितमध्ये नवीन पदाधिकारी जोमाने काम करतील
मुंबई – पक्षाच्या विश्वासहार्तेवर प्रश्न उपस्थित करणे बेईमानीचा नवा अध्याय आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी सांगितले. माजी आमदार बळीराम सिरस्कार आणि 47 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत काल (22 फेब्रुवारी) पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
राजेंद्र पातोडे म्हणाले, 30 वर्षे सत्ता आणि पदे मिळाली, 10 वर्षे आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सभापती, लोकसभा उमेदवारी, जिल्हाध्यक्ष पदासहीत सर्व काही मिळविले आणि पक्षाच्या विश्वासाहार्तेवर प्रश्न उपस्थित करणे बेईमानीचा नवा अध्याय आहे. विधानसभा निवडणुकीत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत उघड-उघड पक्षाच्या विरोधात उमेदवार पाडण्यासाठी फिरणाऱ्या दोन्ही माजी आमदारांनी स्वतःची विश्वासाहार्ता तपासली पाहीजे, असेही राजेंद्र पातोडे म्हणाले.
वंचित आता राज्यासह अन्य राज्यांत एनआरसी, सीएए आणि एनपीआर विरोधात आंदोलन करत आपल्या कक्षा रुंदावत आहे. पक्षाच्या विरोधात जावून केलेल्या बेईमानीवर जालीम उपाय करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील वंचितचे कार्यकर्ते सक्षम आहेत. दोन्ही माजी आमदारांनी पक्ष सोडला असेल तर पक्षाच्या नावावर मिळालेल्या आमदारकीची पेंशन आणि सवलती देखील स्वाभिमान पूर्वक सोडून दिल्या पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीतून एकूण 47 जणांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये माजी आमदार बळीराम सिरस्कार, हरिदास भदे, राज्याचे महासचिव नवनाथ पडळकर, अर्जुन सलगर यांच्यासह अनेक जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख, महासचिव, सल्लागारांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.