पुणे, दि. 3 -राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह प्रमुख महापालिका निवडणुकांसाठी मनसेची भाजप-शिंदे सेनेसोबत युती करण्याची चर्चा सुरू असली तरी, मनसेने पुण्यात मात्र पालिका निवडणुकीसाठी जोरदार आखणी केली आहे. शहरातील प्रत्येक घरात तसेच मतदारांपर्यंत पक्ष पोहचविण्यासाठी मनसे पुण्यात एक हजार लोकांमागे एक राजदूत नेमणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी शासनाने 35 लाखांची लोकसंख्या निश्चित केल्याने त्यानुसार मनसे सुमारे 3500 राजदूत पुण्यात नेमणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत पदाधिकारी आणि पक्षाच्या सचिवांची बैठक घेतली. त्यानंतर पुण्यात झालेल्या बैठकीत तातडीने राजदूत नेमण्याच्या सूचना विभाग अध्यक्षांना देण्यात आल्या असून, 25 नोव्हेंबरपूर्वी या नियुक्त्या पूर्ण केल्या जाणार आहेत. पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेने “राजदूत’ ही नवी संकल्पना आणली आहे. या उपक्रमातून मनसे पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला आहे. 2007 च्या निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर 2012 मध्ये मनसेचे थेट 28 नगरसेवक निवडून आल्यानंतर मनसेकडे महापालिकेचे विरोधी पक्ष नेतेपद आले. मात्र, 2017 मध्ये मनसेला पुण्यात केवळ दोन जागा जिंकता आल्या. त्यानंतर आता पुन्हा महापालिकेत मनसेचे बळ वाढविण्यासाठी पक्षाकडून गेल्या वर्षभरापासून कंबर कसली असून, मनसे अध्यक्ष स्वत: पुण्यात लक्ष घालत असून, पक्षाकडून संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला आहे. त्यानंतर आता पक्षाकडून मनसे राजदूतांच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. लवकरच ही राजदूतांची नेमणूक केली जाणार असून, त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यात मेळावा घेण्यात येणार आहेत. या मेळाव्यानंतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भव्य सभा देखील घेतली जाण्याची शक्यता आहे.
राजदूताची नियुक्ती झाल्यानंतर त्याने संबंधित भागात पक्षाची ध्येय धोरणे यांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. शिवाय या अगोदर तिथे पक्षाच्या नगरसेवकाने केलेली कामे, लोकांपर्यंत पोचवायची आहेत. पक्षसंघटनेसाठी हा महत्वाचा निर्णय असून, पक्षाला निवडणुकांमध्ये त्याचा निश्चित फायदा होणार आहे. – साईनाथ बाबर, पुणे शहर अध्यक्ष, मनसे