नवी दिल्ली : देशात सध्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. दरम्यान, या शर्यतीत असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गांधी घराण्यातील कोणीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे आता या पदावर कोण बसणार याविषयी राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात असल्याचे दिसत आहे.
यातच राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. तर अध्यक्षपदाच्या रेसमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे सर्वात आघाडीवर आहे.
यावर आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलतांना मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले,’जी-23ने अंतर्गत निवडणुका घेऊन पूर्णवेळ अध्यक्ष देण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झाली आहे. परंतु, पक्षाला पार्ट टाईम अध्यक्ष नको. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा. नव्या अध्यक्षाने लोकांची मोकळेपणाने भेट घेतली पाहिजे, असं चव्हाण यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
तत्पूर्वी, अशोक गेहलोत यांनी याविषयी बोलताना म्हटले, “गांधी घराण्यातील कोणीही आगामी काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार नाही, असे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे. अशोक गेहलोत यांनी केरळमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतली त्यानंतर माध्यमांना माहिती देताना त्यांनी ही माहिती दिली. “मी त्यांना अनेकवेळा विनंती केली की त्यांनी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष व्हावे, ही सर्वांची इच्छा मान्य करावी. मात्र त्यांनी मला सांगितले की, यंदा गांधी घराण्यातील कोणीही व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून उभा राहणार नाही, असे त्यांनी ठरवले आहे.”