राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचा पक्षबदलूंना सल्ला
पुणे – “सार्वजनिक जीवनात काम करत असताना पदाची अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही. मात्र, पदासाठी पक्ष आणि मतदारांच्या निष्ठेशी तडजोड करू नका,’ असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात भाषणादरम्यान दिला. मात्र, सल्ला पक्ष सोडून जात असलेल्यांना उद्देशून होता? दुर्दैवाने पक्ष, निष्ठा, वैचारिक निष्ठा बाजूला ठेवली जात आहे. विरोधी पक्ष कमवूत असणे देशासाठी, लोकशाहीसाठी आणि जनतेसाठी मारक असून, हा धोक्याचा इशारा असल्याचे पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेते, पदाधिकारी भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्यामुळे पक्षात चिंतेचे वातावरण आहे. कोण, कधी? कोणत्या क्षणी पक्षांतर करेल याची शाश्वती नाही. त्यामुळे नाराज गट, पक्षांतराच्या तयारीत असलेले पदाधिकारी आणि नेते यांच्या बैठका घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान पवार बोलत होते.
“राजकीय जीवनात भाषणापेक्षा तुमचे काम बोलले पाहिजे. काही व्यक्ती बोलघेवड्यांसारखी भाषणे करतात. भाषण करून पाठ फिरवली, की कामाच्या नावाने….’ असे म्हणत पवार यांनी पुढचा शब्द टाळला. परंतू, हा गंमतीचा भाग सोडून द्या, असे म्हणत “तुमचे काम बोलले तर तुमचे मतदार, परिसर तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. लाटा येता-जातात, आपले काम उत्तम असेल तर कोणतीही लाट आपण थोपवू शकतो. याचा अनुभव शरद पवार यांचा आहे. त्याच्या आजवरच्या जीवनात अनेक चढ-उतार आले, पण ते कधीही डगमगले नाही. त्यांनी हार पत्करली नाही. कारण, त्यांनी आतापर्यंत केलेले काम बोलत आहे. त्यांच्याविषयी समाजामध्ये एक विश्वास पहायला मिळतो,’ अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.