जयपूर – बंडाची तलवार म्यान केल्यानंतर कॉंग्रेसचे तरूण नेते सचिन पायलट मंगळवारी राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये परतले. पक्षाकडे कुठलेच पद मागितले नसल्याचे त्यांनी त्यानंतर म्हटले. त्यामुळे राजस्थानमधील राजकीय पेच मिटवण्याच्या उद्देशातून कॉंग्रेस आता पायलट यांच्यावर कुठली जबाबदारी सोपवणार याविषयीची उत्सुकता बळावली आहे.
पायलट आणि त्यांच्या काही समर्थक आमदारांनी बंड पुकारल्याने राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार अडचणीत आले. ते बंड प्रामुख्याने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात होते. त्यामुळे राजस्थानविषयी महिनाभर राजकीय सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेर दिल्लीत पायलट यांनी सोमवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली. त्या भेटीमुळे पायलट समझोत्यास तयार झाल्याचे समोर आले. त्यानंतर जयपूरमध्ये दाखल झालेल्या पायलट यांना पत्रकारांनी गाठले.
पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर पक्षाकडे कुठलेच पद मागितले नसल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, माझ्याविरोधात वापरण्यात आलेल्या भाषेमुळे मी व्यथित झालो. राजकारणात कुणाबद्दल व्यक्तिगत पातळीवर वाईट भावना बागळली जाऊ नये. सुडाचे राजकारण केले जाऊ नये, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे गेहलोत यांच्यावर निशाणाही साधला.
पायलट यांच्याविषयीचा फॉर्म्युला माहीत नाही-गेहलोत
मुख्यमंत्री गेहलोत यांनी पायलट समर्थक आमदारांची गाऱ्हाणी ऐकून घेण्याची तयारी दर्शवली. कॉंग्रेस आणि पायलट यांच्यात पॅच-अप झाल्याच्या पार्श्वभूमीवर गेहलोत पत्रकारांशी बोलत होते. कॉंग्रेसच्या काही आमदारांनी बंड का केले आणि त्यांना कुठले आश्वासन देण्यात आले ते मला ठाऊक नाही. पायलट यांनी घरवापसी करण्यासाठी निश्चित करण्यात आलेला फॉर्म्युला माहीत नाही, असेही गेहलोत म्हणाले.