प्रश्न निरुत्तरीतच : उपाय सूचवूनही उपाययोजना होईना
– कल्याणी फडके
पुणे – “एक व्यक्ती, एक वाहन’ अशी स्थिती शहरात असताना पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न “दुर्लक्षित’च आहे. कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर ही वाहने “पार्क’ करायची कोठे, हा प्रश्न आजही निरुत्तरीत आहे.
महापालिकेचे पार्किंग धोरण सक्षम नसल्याने शहरातील राखीव जागांचा योग्य वापर होत नसल्याचे मत वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. याचा सर्वांत जास्त फटका मध्यवर्ती पेठा, कोथरूड, शिवाजीनगरसह हिंजवडी, खराडी, येरवडा यासारख्या “आयटी’ कंपन्यांची संख्या अधिक असणाऱ्या परिसराला बसत आहे. महापालिकेची बोटावर मोजण्याइतकी वाहनतळे आणि निवडक रस्त्यांच्या बाजूला असणारे सम-विषम पार्किंग वगळता इतरत्र परिस्थिती बिकट आहे. ही सुविधा अत्यंत मुलभूत आणि गरजेची असताना त्याच्या अंमलबजावणीबाबत मात्र उदासीनता आहे.
पुरेसे पार्किंग नसल्याने अनेकदा नागरिक अयोग्य पद्धतीने वाहने उभी करतात. यामुळे नाहक कोंडी होते. “बेशिस्त’ पार्किंगमध्ये लोखंडी जाळ्यांची भर पडते. दुकाने, ऑफिससमोरील रस्त्यावर कोणी वाहने लावू नयेत, यासाठी अनेक विक्रेते अनधिकृतपणे लोखंडी जाळ्या, फरशा, लाकडी ब्लॉक ठेवतात. दरम्यान, शहरामध्ये पार्किंग योजनेची अंमलबजावणी होण्याची गरज आहे. हे धोरण अधिक लवकर लागू करण्याची मागणी महापालिकेला केल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.
लष्कर भागात पार्किंग योजना
लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, मंडई, डेक्कन आदी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये अनेकदा अपुऱ्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होते. तर, लष्कर भागात गेली अनेक वर्षे पार्किंग योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या परिसरात “पे ऍन्ड पार्क’ धोरण राबवले जात आहे. यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे.
शहरातील मध्यवर्ती भागांतील इमारतींमधील पार्किंग “पे ऍन्ड पार्क’ या धोरणानुसार सर्वांना खुले केले पाहिजेत. जास्तीतजास्त वाहने पार्क करता यावीत, यासाठी वाहनतळांची संख्या वाढवली पाहिजे.
– आदित्य महाजन, नागरिक