मांडवगण फराटा – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होऊन आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. एकीकडे प्रशासन आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न करीत आहे. शिरूर तालुक्यातील राजकीय पक्षांना आचारसंहितेचाच विसर पडल्याचे दिसून येत आहे.
शिरूरच्या पूर्व भागातील गावांत राजकीय पक्षांच्या विकासकामांचे उद्घाटन, भूमिपुजनाचे फलक अजूनही झाकलेले नाहीत. त्यामुळे आदर्श आचारसंहिता लागून सहा दिवस झाल्यानंतरही राजकीय पक्षाकडून आचारसंहितेचा भंग केला जात आहे.
दरम्यान, शासनाच्या निधीतून तसेच आमदार, खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून बांधलेल्या सभागृहावरील त्यांची नावे आणि उद्घाटनांचे, तसेच भूमिपूजनांचे फलक झाकण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. तरी आंधळगाव येथे अजूनही विविध विकासकामांचे फलक न झाकल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याचे चव्हाट्यावर आले आहे. दरम्यान, आचारसंहिता लागू होऊनही सहा दिवसांनंतरही राजकीय पक्षांनी फलक न झाकल्याने त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.