इस्लामाबाद – करोनाच्या वाढत्या संख्येने भारतातील अनेक शहरात निर्माण झालेल्या आणीबाणीच्या स्थितीवर मात करण्यासाठी पाकिस्तानातील मानवतावादी संस्था “इधी फाउंडेशन’ने 50 रुग्णवाहिकांचा ताफा भेट देण्याची तयारी दर्शवली आहे. इधी फाउंडेशनचे संचालक फैजल इधी यांनी त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.
“आपल्या देशांत थैमान घातलेल्या साथीच्या परिणामांची माहिती वाचून मी व्यथित झालो आहे. नागरिक मोठ्या संख्येने या आजाराचा सामना करत आहेत. आपला शेजारचा मित्र म्हणून या काळात आमची सहानुभूती आपल्यासोबत आहे. त्यामुळे आमच्या सेवेसह 50 रुग्णवाहिकांची मदत आम्ही आपल्याला पाठवू इच्छितो,” असे त्यांनी भारताच्या दूतावासाकडे दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
“बातम्यांमध्ये आलेल्या माहितीनुसार भारतीयांना सामोरे जावे लागणाऱ्या अडचणींचा विचार करून संस्थेने ही मदत देण्याची इच्छा व्यक्त केली आहे,” असे फैजल इधी यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले.
“लोकांना याचा त्रास होतो आणि त्याचा आमच्यावर परिणाम होतो. आम्ही पाकिस्तानभर करोनाचा मुकाबला करत आहोत. त्यामुळे आम्हाला याचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे,” असे ते म्हणाले.
“जर भारत सरकारने आम्हाला परवानगी दिली तर आम्ही सीमेपलीकडे जाऊन मदत देण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी केली आहे. ते ज्या गावांत परवानगी देतील त्या गावात जाऊन मदतकार्य करण्याची आमची तयारी आहे. आम्ही भारतीय प्रशासनाला पूर्ण सहकार्य करू आणि आम्ही शक्य ती सर्व मदत करू,” असे त्यांनी स्पष्ट केले