मुंबई – राज्यात अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यामुळे वारंवार करोना लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहे. मुंबई, ठाणे, वसई विरारसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. यामुळे लस घेण्याच्या प्रतिक्षेत असलेले नागरिक हैराण झाले आहेत.
करोना लसींच्या तुटवड्यामुळे मुंबई महापालिकेतील बहुतांश रुग्णालयात लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. करोना लसींचा तुटवडा असल्याने मुंबई महापालिकेने आज बुधवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. जुलैच्या तीन आठवड्यांमध्ये मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची ही तिसरी वेळ आहे. यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई महापालिकेला गेल्या शुक्रवारी 45 हजार लसमात्रा मिळाल्या होत्या. मात्र पावसामुळे शनिवारी लसीकरण कमी झाले. त्यामुळे हा लससाठा मंगळवारपर्यंत वापरण्यात आला. मंगळवारी आणखी लससाठा मिळणे अपेक्षित होते. पण, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत लससाठा मिळण्याबाबत कोणत्याही सूचना मिळाली नाही.
त्यामुळे आज अखेर पालिकेने लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातही अनेक शहरांत आज लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. तसेच वसई विरार महापालिका हद्दीत आज दिवसभरासाठी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत.