शर्यत बंदीनंतरही एका बैलासाठी मोजले तब्बल साडेसोळा लाख
नवलाख उंब्रे गावामधील शेतकऱ्याच्या हौसेची होतेय सर्वत्र चर्चा
इंदोरी – शेतकऱ्याचा आवडता मित्र म्हणजे बैल. शेतीकामात नेहमी मदतीला येणारा व बळीराजाच्या सुख-दु:खात कायम सोबत असणाऱ्या बैलाला आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत खूप महत्त्व आहे. आजच्या तांत्रिक युगात बैलाचे महत्त्व कमी होत असताना मात्र मावळ तालुक्यातील एका शेतकऱ्याने बैलाची आवड, त्यावर असलेले प्रेम आणि जिव्हाळ्यापोटी तब्बल साडेसोळा लाख रुपये मोजले आहेत. एवढेच नाही तर वाजतगाजत या बैलाची मिरवणूक काढत त्याला घरी आणले. त्याच्या या हौसेची सर्वत्र चर्चा होत आहे.
मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील पंडितमामा जाधव असे या हौशी शेतकऱ्याचे नाव आहे. पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी येथील शेतकरी अमोल दगडू जाधव व लोहगाव येथील हरीशेठ पवार यांना असलेल्या बैलांची आवड व त्यांचा सांभाळ करण्यासाठी वर्षानवर्षे कष्ट घेत चांगल्या तयार केलेल्या बैलांना चांगली किंमत मिळत आहे. मॅगी नामक बैलाला पंडितमामा जाधव यांनी तब्बल साडेसोळा लाखाला खरेदी केल्यामुळे मावळात चर्चेचा विषय ठरत आहे. शेतकऱ्यांच्या आवडत्या बैल शर्यती सरकारने बंद केल्या असल्या तरी भविष्यात लवकरच बैलशर्यती चालू होतील, या आशेवर शेतकरी आहेत.
बैलगाडा शर्यतीवर बंदी असली तरी पंडितमामा जाधव यांनी विकत घेतलेल्या बैलाची तब्येत, नजर, धावण्याची क्षमता पाहून मॅगीनामक बैलाचा भार न समजता लाखो रुपये मोजून त्याची मिरवणूक काढली आहे, याची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.