लखनौ – अयोध्येमध्ये 1992 साली बाबरी मशिद उद्ध्वस्त केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी याच्यासह अन्य आरोपींवर विशेष न्यायालयात दाखल झालेल्या खटल्याचा निकाल आज (बुधवारी) दिला जाणार आहे.
या प्रकरणातील सर्व 32 आरोपींनी 30 सप्टेंबरला न्यायालयात उपस्थित रहावे, असे निर्देश सीबीआयचे न्यायाधीश एस.के. यादव यांनी 16 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळीच दिले आहेत.
या आरोपींमध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्याशिवाय विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांचा समावेश आहे.
उमा भारती आणि कल्याण सिंह यांना करोना विषाणूची लागण झाली असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते दोघेही उद्या न्यायलयात उपस्थित राहणार आहेत की नाहीत, हे समजू शकलेले नाही. राम मंदिर उभारणीसाठीच्या प्रभारी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हेही आरोपींमध्ये आहेत.
या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 31 ऑगस्टपर्यंतची मुदत निश्चित केली होती. मात्र सीबीआय न्यायालयासाठी ही मुदत महिन्याभराने वाढवण्यात आली त्यानंतर दैनंदिन सुनावणी सुरू केली गेली.
सीबीआयने 351 साक्षीदार आणि पुरावा म्हणून 600 कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केले आहेत. 48 जणांवर आरोपपत्र दाखल केले गेले. मात्र खटल्यादरम्यान 17 जणांचा मृत्यू झाला आहे.