सर्वपक्षीय नगरसेवकांचा आयुक्तांवर हल्लाबोल
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महासभेत सोमवारी महापालिका प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव झाला. करोनाची परिस्थिती चांगली हाताळली असल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी कौतुक केले होते. मात्र गुरुवारी झालेल्या महासभेत मात्र नगरसेवकांनी आयुक्तांवर हल्लाबोल केला. बुधवारी वादळामुळे शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांना धारेवर धरले. चक्रीवादळ येणार हे माहीत असूनही प्रशासनाने काहीच तयारी केली नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला याला प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांवर तोंडसुख घेतले.
महापालिकेची विशेष सभा गुरुवारी पार पडली. महापौर माई ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी निसर्ग चक्रीवादळामुळे शहरात उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.
नगरसेवक शीतल शिंदे म्हणाले, आपल्याकडे यंत्रणा कमी आहे. त्यामुळे सगळ्या शहरवासियांना त्रास झाला. चक्रीवादळ येणार हे माहिती होते तर प्रशासनाने यंत्रणा व मनुष्यबळ उपलब्ध करणे आवश्यक होते. वैशाली घोडेकर म्हणाल्या, प्रशासनावर वचक ठेवण्याचे काम सत्ताधाऱ्यांचे आहे. सत्ताधाऱ्यांनी नियोजन का केले नाही. शहरावर ही परिस्थिती ओढावली त्याला आयुक्तांइतकेच सत्ताधारी देखील आहेत. आपत्ती व्यवस्थापनाकडे मनुष्यबळच उपलब्ध नाही. नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, आपत्कालीन व्यवस्था कुचकामी ठरली. आयुक्तांना तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळे दुसरे वेध लागले आहेत.
कोणी दगावल्यास 302 चा गुन्हा
काल पडलेली झाडे काढण्यासाठी अनेकवेळा अधिकाऱ्यांना फोन केले. मात्र त्यांच्याकडून उत्तर मिळाले नाही. सारथीवर ही तक्रार केली आहे. मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने शहरात ही परिस्थिती ओढावली. त्याला प्रशासनही जबाबदार आहे. यापुढे शहरातील एक जरी माणूस अशा आपत्तीमध्ये दगावला तर मी प्रशासनावर व संबंधित अधिकाऱ्यावर खूनाचा गुन्हा दाखल करेल असा इशारा उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिला.
सगळी झाडे काढण्यासाठी 48 तास लागतील – आयुक्त
महासभेमध्ये सर्व नगरसेवकांनी आपत्ती व्यवस्थापनच्या अपयशावर खुलासा करण्याची मागणी केली. त्यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, निसर्ग चक्रीवादळाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. त्याअनुंषगाने नागरिकांना पूर्वसूचना देण्यात आली होती. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. दुपारी चार ते पाच या कालावधीत वाऱ्याचा वेग जास्त होता. यामध्ये सर्वात जास्त झाडे पडली. उद्यान विभागाला एकूण 224 व अग्निशामक विभागाला 104 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आतापर्यंत उद्यान विभागाने 127 व अग्निशामक विभागाने 74 ठिकाणची झाडे बाजूला केली आहेत. उर्वरित झाडे काढण्यासाठी अजून 48 तासांचा अवधी लागेल. कारण एका ठिकाणी चार ते पाच झाडे पडलेली आहेत.