मुंबई: मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबईतील मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्यावर आता विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे. याच टीकेचा समाचार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर टीका करताना, “जे पाहिजे ते काम डबल इंजिन सरकारकडून करुन घ्या. विरोधी पक्षाला विनंती केली आहे की, टोमणे मारण्यापेक्षा देशाचे पंतप्रधान येतात तेव्हा त्यांच्याकडे मागणी करायची असते. विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी पक्षाने मिळून काम केल्यास राज्य पुढे जाईल. विधायक भूमिका घ्या. पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नाहीत, तर देशाचे आहेत. मात्र, विरोधकांनी राज्यासाठी काही मागितले नाही.”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत महानगरपालिका, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि अन्य काही संस्थांच्या नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठीच्या नियोजनासाठी मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. मात्र यापैकी बहुतांश प्रकल्पांचे नियोजन हे शिवसेनेच्या कार्यकाळात झाले असल्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपमध्ये श्रेयाची लढाई जुंपली आहे.