नगर – शहरात व सावेडी उपनगरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या रोहित्रे कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी न घेता धोकादायक रित्या सताड उघडे पडलेले असतात. या रोहित्राच्या फ्युज पेट्या उघड्या रहदारीच्या रस्त्यालगत असल्यामुळे कधीही मोठी दुर्घटना, जीवितहानी होऊ शकते. मात्र या संदर्भात अनेकदा निदर्शनास आणून दिल्या नंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नागरीकांत संताप व्यक्त होत आहे.या रोहित्र पेट्या तातडीने बंद कराव्यात अशी मागणी होत आहे.
सध्या शहरामध्ये गेल्या चार महिन्यांपासून मोठा पाऊस होत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या रोहित्राच्या उच्च दाब वीजवाहक पेट्या कोणत्याही प्रकारचे झाकण न लावता अक्षरशः उघडे पडलेले असतात. कोणत्याही लहान मुलाचा जाता येता त्याला धक्का लागू शकतो. आणि खांबाला लावलेल्या या बॉक्स मधील वीज प्रवाह उच्च दाबाच्या असल्यामुळे थोडासा स्पर्श झाला तर माणूस तिथेच गतप्राण होईल.
ही बाब इतकी धोकादायक असूनही संबंधित अधिकारी जर या कडे गांभीर्याने पाहत नसतील तर आंदोलनाचा इशाराही काही संघटनांकडून देण्यात आला आहे. तीन महिन्यांपूर्वी पोलीस वसाहती मधील पोलिस कर्मचाऱ्याची मुलगी वीजमंडळाच्या बेजबाबदार, कार्यपद्धतीमुळे विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडली असतानाही मंडळाने यापासून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. केवळ चार दिवस दुःख करून पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असे जर होत असेल तर हे क्लेशदायक आहे. सावेडी रोड वरील सिव्हिल हडको वसाहतीतील अनेकांच्या घरावरून अगदी हात लागेल इतक्या जवळून उच्च दाबाच्या वीज वाहक तारा गेलेल्या आहेत.