अतिवृष्टीमुळे यंदा 20 ते 25 दिवस उशिराने हंगाम
पुणे – गोड चवीच्या सीताफळांचा पावसाळी बहार सुरू झाला आहे. सुरुवातीच्या काळात पडलेला दुष्काळ, त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा 20 ते 25 दिवस उशिराने हंगाम सुरू झाला आहे. शुक्रवारी मार्केटयार्डात तब्बल 30 टन आवक झाली. बाजारात दाखल झालेल्या मालास घाऊक बाजारात प्रति किलोस दर्जानुसार 10 ते 130 रुपये भाव मिळत आहे. हा भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असून, मागील वर्षी हंगामाच्या सुरुवातीस किलोस 30 ते 200 रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापारी आणि श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची, व्यापारी माऊली आंबेकर, व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली.
मार्केटयार्डात वडकी, सासवड, बारामती, असवली, सातारा, कन्हेरी, तळेगाव, शिक्रापूर, जगतापवाडी या भागातून सिताफळाची आवक होत आहे. पावसामुळे पाणी मिळाल्याने उत्तम दर्जाचा आणि गोड माल बाजारात दाखल होत आहे. मागील दोन वर्षे विविध कारणांमुळे सीताफळाचे उत्पादन कमी झाले होते. पहिल्या बहारातही अपेक्षित आवक झाली नाही. आता मात्र, या बहारात जास्त आवक होत आहे. 5 दिवसांत सीताफळाच्या भावात 25 ते 30 टक्के घसरण झाली असल्याचे काची यांनी सांगितले. तर, व्यापारी माऊली आंबेकर म्हणाले, बाजारात दाखल होणाऱ्या मालाला चांगली मागणी आहे. ज्युस विक्रेते, पल्प आणि आईस्क्रीम विक्रेत्यांकडून सिताफळाला मागणी वाढली आहे.
डिसेंबरपर्यंत हा सीताफळाचा हंगाम सुरू राहणार असून, 20 नोव्हेंबरपर्यंत आवक जास्त राहील. त्यानंतर हळूहळू आवक कमी होत जाते. आवक वाढल्यानंतर भावात आणखी घसरण होणार असल्याचे आंबेकर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, मराठवाड्यातून तुरळक प्रमाणात मार्केटयार्ड सीताफळ येत असून, थोड्या दिवसांत त्यामध्ये वाढ होईल, असे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी म्हटले आहे.
मी पाच एकर शेतामध्ये सिताफळाची लागवड केली आहे. यंदा उत्पादन चांगले मिळत असून, 8 दिवसांत दोन तोडे करतो. त्यामध्ये 200 ते 250 क्रेट माल निघतो. 450 ते 700 ग्रॅम वजनाचे फळ आहे. मार्केटयार्डात शुक्रवारी विक्रीसाठी दाखल केलेल्या मालाला प्रति किलोस 130 रुपये भाव मिळाला. हा भाव समाधानकारक आहे.
– सतीशचंद्र घुमे, शेतकरी, टाकळी भीमा, ता. शिरूर.