नवी दिल्ली – आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला या महिन्यात प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघच संभाव्य विजेता मानला जात असून वेस्ट इंडिज, इंग्लंड व बांगलादेश या तीन संघांकडूनच भारताला आव्हान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या स्पर्धेचे यजमानपद जरी भारताकडे असले तरीही देशातील करोनाचा धोका अद्याप टळलेला नसल्याने ही स्पर्धा अमिराती व ओमानमध्ये येत्या 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि बांगलादेश हे संघ गेल्या जवळपास दीड वर्षांपासून क्रिकेटच्या या प्रकारात सातत्याने वर्चस्व सिद्ध करत आहेत.
यापूर्वी 2016 साली झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीत भारताला पराभूत केले होते. त्यासह इंग्लंड संघही टी-20 मध्ये सध्या भरात आहे. 2019 सालची एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा जिंकलेल्या इंग्लंडकडूनही भारताला तुल्यबळ लढत मिळेल.
वेस्ट इंडिज संघातही नवोदित खेळाडू असले तरीही ते सातत्याने सरस कामगिरी करत आहेत.
वेस्ट इंडिजने दोनवेळा टी-20 विश्वकरंडक जिंकला असल्याने तेदेखील भारताला धोकादायक ठरू शकतो.
त्याचबरोबर सध्या बोलबाला आहे तो बांगलादेश संघाचा. त्यांनी मायदेशात झालेल्या मालिकांमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंडलाही पराभूत करण्याची कामगिरी केली होती. तसेच त्यांचे अनेक खेळाडू आयपीएल स्पर्धेतील विविध संघातून खेळत असल्याने त्यांना विश्वकरंडकासाठी चांगला सरावही मिळत आहे.